Sanjay Raut : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत काय होणार? संजय राऊत म्हणतात, ही पार्टी विस्ताराची संधी

शिवसेना हा राजकीय पक्ष केवळ पैसे कुणाकडे आहेत किंवा कोणी तरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष कुणासोबत आहे, म्हणून पक्ष हायजॅक करता येत नाही. आज हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसैनिकांच्या त्यागातून हा पक्ष तयार झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत काय होणार? संजय राऊत म्हणतात, ही पार्टी विस्ताराची संधी
खा. संजय राऊत
Image Credit source: tv9
Pradeep Garad | Updated on: Jun 25, 2022 | 11:04 AM

मुंबई : आजची शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक म्हणजे पार्टीच्या विस्ताराची संधी आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. दुपारी एक वाजता शिवसेनेची कार्यकारिणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यांच्यासोबत गेलेले आमदार आणि महाविकास आघाडीवरचे संकट या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. सध्या शिवसेनेला बंडाचा मोठा फटका बसत असून आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोठे निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नेतेपदावरून काढले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर या कार्यकारिणीच्या निमित्ताने पार्टीचा विस्तार करण्याची संधी आहे, असे संजय राऊत म्हणाले. तर यावेळी त्यांनी भाजपावर (BJP) टीका केली. पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेता येणार नाही, असे ते म्हणाले.

‘काही नवीन नियुक्त्या करू’

राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महत्त्वाची असते. आमची बैठक महत्त्वाची आहे. त्यात अनेक निर्णय होतील. वर्तमान भविष्याबाबत विचार करू. पक्षाच्या विस्तारावर चर्चा करू. काही नवीन नियुक्त्या करू. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी रक्त सांडले आहे. हा पक्ष कोणीही हायजॅक करू शकत नाही. विचारही करू शकत नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिले आहे. केवळ पैशाच्या जोरावर कोणी पक्ष खरेदी करू शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यावर चर्चा होईल. आता जे संकट आहे, त्याला आम्ही संकट मानत नाही. पक्ष वाढवण्याची ही एक मोठी संधी वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

‘आदेशाचीच वाट पाहत आहेत’

पुढे ते म्हणाले, की शिवसेना हा राजकीय पक्ष केवळ पैसे कुणाकडे आहेत किंवा कोणी तरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष कुणासोबत आहे, म्हणून पक्ष हायजॅक करता येत नाही. आज हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसैनिकांच्या त्यागातून हा पक्ष तयार झाला आहे. दहशत आणि अफवेच्या बळावर कोणी पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आले आहेत. सांगली आणि मिरजेतून कार्यकर्ते आला आहेत. फक्त आदेशाची वाट पाहत आहेत. हे उगाच घडत नाही. अनेक ठराव मंजूर होतील. ही कार्यकारिणी देशाला दिशा देणारी ठरेल, असेही ते म्हणाले.

Follow Us