राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; दीपक केसरकर यांचं संजय राऊत यांना आव्हान

प्रत्येक समाजाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे. रॅली काढण्याचा हक्क आहे. त्यामुळे हिंदू सकल समाजाकडून मोर्चा काढला जातोय तर त्यांना तो अधिकार आहे. समाजाच्या ऐक्यासाठी ही रॅली आहे.

राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; दीपक केसरकर यांचं संजय राऊत यांना आव्हान
Deepak Kesarkar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 29, 2023 | 10:43 AM

मुंबई: संजय राऊत हे राज्यसभेत आमच्या मतावर निवडून गेले आहेत. त्यांना थोडी तरी नैतिकीची जाणीव असेल तर त्यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारच मतदान करणार आहेत. त्यामुळे राऊत यांनी हा प्रयोग करून पाहावच, असं आव्हान देतानाच आमच्या मतांवर निवडून आले आणि आमच्याविरोधातच बोलतात. राऊत यांना बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? असा संतप्त सवाल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

दीपक केसरकर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पक्षाचं चिन्हं आपल्याच गटाला मिळणार असल्याचा दावाही केला. पक्ष चिन्हावर आमचाच हक्क आहे. त्यामुळे गुलाल उधळणार की नाही हा भाग नाहीये. नेत्यांना किती मतदान मिळाले हे निवडणूक आयोग पाहतो.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिलं जातं. किती सदस्य निवडून आले हे पाहिलं जातं. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

विचारधारा आमच्यासोबत

पक्षाची विचारधारा कुणाबरोबर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विचारधारा आमच्यासोबत आहे. त्यामुळे हा आमचा हक्क आहे तो आम्हाला निवडणूक आयोग देईल हा मला विश्वास, असंही ते म्हणाले.

राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते

बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतं. संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलाय, असा दावाही त्यांनी केला.

हा बाळासाहेबांचा अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील 370 कलम रद्द केलं. त्या ठिकाणी राऊत हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. काँग्रेससोबत हातमिळवणी करतात. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

तांबे विजयी होतील

आघाडीच्या चार जागा आणि एका पक्षाची मिळून पाचही जागा आमचं सरकार जिंकेल. पोटनिवडणूक आणि पदवीधर निवडणुकीत आमचेच उमेदवार विजयी होतील. सत्यजित तांबे हे नाशकातून विजयी होतील असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

मोर्चा काढण्याचा अधिकार

प्रत्येक समाजाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे. रॅली काढण्याचा हक्क आहे. त्यामुळे हिंदू सकल समाजाकडून मोर्चा काढला जातोय तर त्यांना तो अधिकार आहे. समाजाच्या ऐक्यासाठी ही रॅली आहे. त्यामुळे वेगळ्या नजरेने याकडे पाहण्याचं कुठलंच कारण नाहीं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू संस्कृतीचं रक्षण करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आम्हाला फुरसत नाहीये

जे झोपतात ते स्वप्न बघतात. जे जागे राहतात ते काम करतात. मुख्यमंत्री जागे राहतात. रात्री केवळ दोन-तीन तास झोप घेतात. स्वप्न पाहायची पण फुरसत नाहीये. आम्ही काम करत असतो, असा चिमटाही त्यांनी काढला.