2019 मधील नरेंद्र मोदी यांच्या भेटीतील रहस्य शरद पवार यांनी केले उघड, सरकार बनवण्याबाबत काय झाली होती चर्चा?

| Updated on: May 05, 2023 | 8:39 AM

Sharad Pawar Autobiography : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या सुधारित आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी झाले. त्यात त्यांनी आतापर्यंत उजडेत न आणलेले अनेक पैलू उघड केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचाही खुलासा केला आहे.

2019 मधील नरेंद्र मोदी यांच्या भेटीतील रहस्य शरद पवार यांनी केले उघड, सरकार बनवण्याबाबत काय झाली होती चर्चा?
sharad pawar and narendra modi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी मंगळवारी घेतला. त्यानंतर राज्यातील राजकारण त्यांच्याभोवती केंद्रीत झाले. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते मागे लागले आहेत. गुरुवारी स्वत: शरद पवार यांनी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दोन दिवसांत तुम्हाला हवा तसा निर्णय घेऊ, असे सांगितले. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांच्या पुस्तकात नेमके काय आहे? ही चर्चा बाजूला राहिला. शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक बाबी उघड केल्या आहेत. त्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का घेतली? भेटीत काय चर्चा झाली? त्याचाही खुलासा केला आहे.

काय म्हटले आहे पुस्तकात

2015 नंतरच्या घडामोडींवर प्रकाश टाकणाऱ्या ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या सुधारित आत्मचरित्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता होती. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेत्यांमध्ये सरकार बनवण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली.

काय होती पवार यांची भूमिका

राष्ट्रवादीला भाजपसोबत युती करण्यात फारसा रस नव्हता. पवार यांनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. हे भाजपला स्पष्टपणे सांगणे गरजेचे होते. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. 20 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान मोदी आणि पवार यांची भेट झाली होती.

काय झाली चर्चा

पवार त्यांच्या पुस्तकात लिहितात, “मी नरेंद्र मोदींना भेटलो होतो आणि त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितले होते की आमच्यात (भाजप आणि राष्ट्रवादी) कोणताही राजकीय समझोता होऊ शकत नाही. परंतु जेव्हा पवार मोदी यांनी युती होणार नाही, असे सांगत होते, तेव्हा पक्षातील एका गटास भाजपशी संबंध हवे होते. यामुळेच त्यानंतर अजित पवार यांनी नंतर पक्ष बदलत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

वाजपेयींच्या काळातही चर्चा

अटलबिहारी वाजपेयींच्या काळातही भाजपला राष्ट्रवादीसोबत युती हवी होती, असा दावा पवार यांनी आत्मचरित्रात केला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2014 मध्येही भाजपने राष्ट्रवादीला आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होता, परंतु बहुमतापासून दूर होता. शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली.

पवारांनी लिहिले की, “2014 मध्ये भाजपसोबत झालेल्या चर्चेवेळी मी उपस्थित नव्हतो, पण मला याची माहिती होती, पण अचानक भाजपने शिवसेनेशी हातमिळवणी केली.