शिवभोजन ‘शो पीस’ ठरणार, मुंबईला दिवसाला 450 थाळ्या तर उस्मानाबादला केवळ…

| Updated on: Jan 02, 2020 | 9:13 AM

उस्मानाबाद शहरासह 8 तालुक्यांना दररोज केवळ 250 थाळी जेवण मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याला सरासरी 30 थाळी जेवण मिळणार आहे.

शिवभोजन शो पीस ठरणार, मुंबईला दिवसाला 450 थाळ्या तर उस्मानाबादला केवळ...
शिवभोजन थाळी
Follow us on

उस्मानाबाद : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात अणली असून त्याबाबत शासन निर्णयही काढण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात सध्या एक-एक थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहे. या जीआरमध्ये जिल्हानिहाय देण्यात येणाऱ्या थाळींची आकडेवारी दिलेली आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरसाठी केवळ 1950 थाळींची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसाला 1950 शिवभोजन थाळ्या दिल्या जाणरा आहेत. तर उस्मानाबादच्या वाट्यालाही केवळ 250 थाळ्या आल्या आहेत. ज्या लोकसंख्या पाहता अगदी नगण्य आहेत.

उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजना जाचक नियमांच्या कचाट्यात अडकल्याचं दिसून येत आहे. शासनाकडून काढण्यात आलेल्या जीआरमध्ये राज्यासाठी एकूण 18,000 थाळ्यांची तरतूद करण्यात आली आहे. ही संख्या राज्यातील गरजूंच्या लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे.

सरसकट कर्जमाफीच्या घोषणेनंतर शिवभोजन योजनेतही जाचक अटी असल्याने ‘अजब सरकार, गजब कारभार’ म्हणण्याची वेळ आता सामान्यांवर आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात शिवभोजन थाळीची संख्या अत्यंत कमी असल्याने सरकारने जनतेची क्रूर थट्टा केल्याची टीका आता ठाकरे सरकारवर केली जात आहे .

गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केल्यानंतर त्याचा आदेश काढला आहे. यात मुंबई शहर आणि उपनगरसाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्ग आणि गडचिलोरीला सर्वात कमी 150 थाळ्या देण्यात आल्या आहेत.

शिवाय, उस्मानाबाद शहरासह 8 तालुक्यांना दररोज केवळ 250 थाळी जेवण मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याला सरासरी 30 थाळी जेवण मिळणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मंजूर थाळीचे प्रमाण पाहिले, तर ही योजना केवळ राजकीय स्टंटबाजी ठरणार आहे.

शिवभोजन योजनेत थाळी बरोबरच त्यातील जेवणाच्या प्रमाणावरही बंधन घालण्यात आले आहे. शिवभोजन योजनेत 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि भात मिळणार आहे आणि ते ही दुपारी 12 ते 2 या दोन तासातच.

शिवभोजन योजनेची थाळी ही 50 रुपयाला असून ही योजना राबविणाऱ्या संस्थेला 40 रुपये अनुदान स्वरूपात सरकार देणार आहे. ही योजना 3 महिने प्रायोगिक तत्वावर असून दीर्घ काळ टिकण्यासाठी भविष्यात सामाजिक संस्थांचे योगदान घेतले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचे भवितव्य अंधारातच आहे. सरकारने आगामी 3 महिन्यांसाठी या शिवभोजन योजनेसाठी 6 कोटी 48 लाखांची तरतूद केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला 250 थाळी आहेत तर मुंबई शहर 450, मुंबई उपनगर 1500, ठाणे 1350, औरंगाबाद 500, पुणे 1000 तर 500 पिंपरी चिंचवड अशा थाळी आहेत. या थाळीची संख्या जिल्ह्यासाठी असून त्याची तालुक्यात आणि शहरी भागात विभागणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला नाममात्र थाळी शो पीस म्हणूनच मिळणार आहेत.