‘हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती नामांतर करा’, शिवसेनेच्या गुजराती नेत्याने भाजपला ललकारले

| Updated on: Feb 07, 2021 | 9:56 PM

शिवसेनेच्या गुजराती नेत्याने भाजपला आव्हान दिलं आहे (ShivSena leader Hemraj Shah gives challenge to BJP).

हिंमत असेल तर अहमदाबादचे कर्णावती नामांतर करा, शिवसेनेच्या गुजराती नेत्याने भाजपला ललकारले
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या गुजराती नेत्याने भाजपला आव्हान दिलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हिंमत असेल तर ‘अहमदाबाद’ शहराचे नामांतर ‘कर्णावती’ करुन दाखवावे”, असं आव्हान शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी दिले. “शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने शिवसेनेच्या 7 फेब्रुवारी 2021 रोजी मालाड येथे होणाऱ्या शिवसेनेच्या गुजराती भाषिकांच्या भव्य मेळाव्यात अहमदाबाद चे नामांतर कर्णावती करण्यासाठीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात येईल”, असंदेखील हेमराज शाह म्हणाले (ShivSena leader Hemraj Shah gives challenge to BJP).

“अहमदाबादला कर्णावती हे नाव आहे. पण ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेलं नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नावाचा सुद्धा एक इतिहास आहे. मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे?”, असा सवाल हेमराज शाह यांनी केला (ShivSena leader Hemraj Shah gives challenge to BJP).

“महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच युतीचे सरकार म्हणजेच शिवशाही सरकार 1995 साली अधिकारारुढ झाल्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्यात आले. पण काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती. म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहित असूनही निव्वळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणत आहेत”, असा घणाघात त्यांनी केला.

“2014 पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करु शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ‘अब समय आ गया है !’ असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात. परंतु तो समय अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते होऊ शकलेले नाही”, असं शाह म्हणाले.

“आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असतांना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या केवळ घोषणा न राहता त्या अंमलात कशा येतील त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबादचे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढण्यात याव्यात”, असं हेमराजभाई शाह म्हणाले.

हेही वाचा : संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानमध्ये फूट, कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या निलंबनानंतर अंतर्गत कलह समोर