विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात मुंबई विद्यापीठात जोरदार आंदोलन

| Updated on: Dec 16, 2019 | 9:26 PM

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन (एनआरसी) देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत (Police action in Jamia University).

विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात मुंबई विद्यापीठात जोरदार आंदोलन
Follow us on

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन (एनआरसी) देशभरात जोरदार आंदोलनं होत आहेत (Police action in Jamia University). यात विद्यार्थी सर्वात पुढे असल्याचं दिसत आहेत. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येही छात्रभारती आणि इतर विद्यार्थी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत (Police action in Jamia University). छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आवाहन केल्यानंतर मुंबई विद्यापीठातील आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना, प्राध्यापक आणि पुरोगामी सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.

कलिना विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून एनआरसीला विरोध करण्यात आला. तसेच जामिया विद्यापीठातील पोलिस कारवाईचाही तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देश वाचवा, संविधान वाचवा अशा घोषणाही देण्यात आल्या.

कॅब आणि एनआरसी कायद्यात धर्माच्या आणि जातीच्या नावाने भाजप सरकार भेदभाव करत आहेत. त्याचा विरोध म्हणून आणि जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. अलिगड मुस्लीम विद्यापीठातही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप करत संबंधित संघटनांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना प्रांगणात त्याचा निषेध नोंदवला.

आंदोलनात छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, CYSS, SFI, AISF, JAC, NSUI, PSU, AIPC, AYW, TISS student Union, SIO, NCP youth wing, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी, पुरोगामी आणि संविधानवादी विद्यार्थी संघटना निषेध करण्यासाठी आंदोलनात सामील झाल्या होत्या. जवळापस 2500 पेक्षाही अधिक विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. यावेळी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग आणि तुषार गांधी हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते.

जामिया विद्यापीठामधील विद्यार्थी मारहाण आणि हिंसेवर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला आहे. दुसरीकडे दिल्ली काँग्रेसने पोलिस मुख्यालयावर आंदोलन करत जामियामधील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा निषेध केला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी स्वतः दिल्लीतील इंडिया गेटवर आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांच्या या कारवाईची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नसल्याचं म्हटलं आहे.