मुंबई : शिवसेना या अधिकृत पक्षाने काढलेल्या व्हीपचा (Whip) बंडखोर 39 आमदारांनी भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिली आहे. आज विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेतर्फे व्हीप बजावण्यात आला होता. मात्र शिवसेनेच्या 39 बंडखोर आमदारांनी तो व्हीप मानला नाही. अशाप्रकारचा व्हीप शिवसेना बजावू शकत नाही, असे एकनाथ शिंदे गटाने म्हटले आहे. त्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात असंवैधानिक काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीमाना दिल्यानंतर सरकार बाजूला झाले. राज्यपालांनी त्यानंतर सर्वात मोठ्या पक्षाला बोलावले पाहिजे होते, असे अरविंद सावंत म्हणाले.
आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत, असे सांगत अरविंद सावंत म्हणाले, की बंडखोर 39 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र त्यांनी आज शपथ घेतली. अध्यक्षपदाची निवडणूक आज झाली. त्यापूर्वी आमच्या प्रतोदांनी सर्वांना राजन साळवींना मतदान करण्याचा व्हीप जारी केला. त्यानंतर मतदान झाले. मतमोजणी झाली. शिवसेनेच्या 39 सदस्यांनी पक्षादेश पाळला नाही. त्यामुळे गटनेत्याने जाऊन उपाध्यक्षांना पत्रे दिले आणि 39 सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्ही नव्या अध्यक्षांकडे पिटीशन सादर केले. संविधानाच्या परिशिष्ट 10मधील कलम 2ए (अ) यामधील अ मध्ये चार पॅरेग्राफ आहे. त्याचे उल्लंघन होत आहे. त्यानुसार या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. नवीन अध्यक्ष काय कारवाई करतात, हे पाहायचे आहे, असे ते म्हणाले.
लोकसभेचे जनरल सेक्रेटरी पीडीटी अचारी यांचे लाइव्ह लॉमध्ये कथन आले आहे. कोणता पक्ष ओरिजिनल? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. त्याचे सदस्य आहेत. त्याला पक्षप्रमुख आहे. उद्या कोणीही दहा जण येतील आणि हा आमचा गटनेता आहे, असे सांगेल हे चालेल का, त्याला मान्यता आहे का, कोण तुम्ही, असा सवाल करत तुमचे अस्तित्व मान्य नाही. परिशिष्ट दहा 2 ए (ए)मधील चारही कलमे वाचा. केवळ शिवसेना पुरते नाही, महाराष्ट्राच्या राजकारणापुरते नाही तर देशाच्या संविधानावरच घाव घातला जात आहे. त्यांनी कुणालाही नेमू द्या, ते व्हॅलिड असावे लागते. त्यांना तसा अधिकार आहे का, त्यांना गटनेते म्हणून मान्यता आहे. दोन तृतियांश आहे. पण नेमका कोण गटनेता. पक्षाचे प्रमुख गटनेता नेमतो. पक्षप्रमुखांना नेते मानता तर त्यांचे आदेश पाळणार की नाही, असेही त्यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले.