काळी-पिवळीच्या मीटरमध्ये फ्रॉड…टॅक्सी युनियन लीडरची धक्कादायक कबूली

| Updated on: Dec 05, 2022 | 2:38 PM

लीगल मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून मीटर रिकॅलिबरेशनचे काम आरटीओ डिपार्टमेंटकडे गेल्यानंतर हा प्रकार सुरू झाल्याचे म्हटले जाते. अवघ्या काही हजार रुपयांमध्ये मीटर फास्ट करुन मिळते असे सूत्रांनी सांगितले.

काळी-पिवळीच्या मीटरमध्ये फ्रॉड...टॅक्सी युनियन लीडरची धक्कादायक कबूली
taxi
Image Credit source: social media
Follow us on

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : टॅक्सी चालकांसाठी इलेक्टॉनिक मीटर (electronic meter) आल्यानंतर तरी प्रवाशांची लुबाडणूक कमी होईल ही आशा फोल ठरली आहे. कारण नव्या इलेक्टॉनिक मीटरमध्येही टॅक्सी (taxi ) चालक हेराफेरी करीत असल्याची कबूली खुद्द मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए.एल. क्वॉड्रोस यांनीच दिली आहे. त्यामुळे ( transport department ) परिवहन विभागापुढे हे फार मोठे आव्हान उभे राहीले असल्याचे म्हटले जात आहे.

जवळची भाडी नाकारणारे टॅक्सी चालक मीटर पळविण्यातही चांगलेच पटाईत असतात. काळी-पिवळी टॅक्सीने सारख्याच अंतराचा प्रवास करताना ट्रॅफीक नसतानाही भाड्यात अचानक माेठा फरक दिसल्यास मीटर पळविल्याचे रोजच्या प्रवाशांना सहज ध्यानात येत असते. हा टॅक्सी चालकाने इलेक्टॉनिक मीटरमध्ये फेरफार केल्याचा ढळढळीत पुरावाच असताे. मात्र, घाईत असलेले प्रवासी फारसा वाद न घालता निमूटपणे भाडं देत असतात. त्यात आता मीटरमध्ये नवीन भाड्या प्रमाणे बदल न केल्याने चार्ट पाहून ड्रायव्हर सांगेल ते भाडे दिले जात असल्याने अशा टॅक्सी चालकांसाठी मोकाट रान मिळाले आहे.

इलेक्टॉनिक मीटरचा पल्स जनरेटर करण्यासाठी सेंसर वायरला एफएम सर्कीट किंवा एलई़डी बसवून 12 व्होल्टच्या बॅटरीव्दारे मीटर डबल फास्ट पळविता येते असे सूत्रांनी सांगितले. एप्रिल 2012 पासून मुंबई आणि उपनगरासह राज्यातील रिक्षा-टॅक्सींना इलेक्टॉनिक मीटर बंधनकारक केले असून प्रवासी सरकारवर विश्वास ठेऊन प्रवास करीत आहेत. आता तर टॅक्सी मीटरची ‘टेबल टेस्ट’ करण्याची परवानगी राज्य सरकारने एका टॅक्सी युनियनलाच दिली आहे ! आणि यात आता युनियन लीडरनेच मीटरची हेराफेरी हाेत असल्याची कबूली दिल्याने खळबळ उडाली आहे.

टॅक्सी मीटरचे सिल खोलून ते संपूर्णपणे उघडण्याची परवानगी मिळाल्याने त्यात आता सहज फेरफार करुन दिला जात आहे, त्यामुळे यापुढे काळी-पिवळी टॅक्सीत बसताना मीटरच्या एलईडी लाईटच्या चमकण्याकडे आणि टॅक्सी चालकांच्या हालचालीकडे नीट लक्ष द्यावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

एका ऑटो रिक्षा संघटनेलाच मीटरची ‘टेबल टेस्ट’ करण्याची परवानगी दिली आहे, याबद्दल विचारले असता त्यांनी युनियनलाच ‘टेबल टेस्ट’ची परवानगी दिली आहे, ही गोष्ट खरी आहे, परंतू टॅक्सीची रोड टेस्ट आरटीओ अधिकारीच करतात असे त्यांनी स्पष्ट केले. मीटरमध्ये फेरफार करणारे अप्रामाणिक टॅक्सीचालक एकूण टॅक्सी चालकांच्या संख्येच्या तुलनेत खूपच कमी असल्याचा दावा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वॉड्रोस यांनी टीव्ही नाइन मराठीशी बाेलताना केला आहे.

काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या भाड्यात 1 ऑक्टोवरपासून भाडेवाढ करण्यात आली आहे. या नवीन भाडे दरानूसार अनेक रिक्षा-टॅक्सी चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन केलेले नाही. मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी
वाहतूक प्राधिकरणाने दिलेली 30 नोव्हेंबरची दिलेली मुदत आज ( बुधवारी ) संपत आहे. याबाबत विचारले असता मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आम्ही वाहतूक प्राधिकरणाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत 43 हजार काळी-पिवळी टॅक्सी चालक असून त्यातील केवळ 40 टक्के टॅक्सीचे रिकॅलिबरेशन पूर्ण झाले असल्याचेही क्वॉड्रोस यांनी सांगितले. ही आरटीओने दिलेली संख्या आहे. प्रत्यक्षात कोरोनाकाळात परराज्यात आपआपल्या गावी गेलेले टॅक्सी चालक पुन्हा मुंबईत परतलेच नसल्याचेही क्वॉड्रोस यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या भाड्याप्रमाणे क्यूआर कोडयुक्त भाड्याचा तक्ता रिक्षा-टॅक्सी चालकांना पुरविण्यात आला आहे. हा क्यूआर कोड मोबाईल फोनने स्कॅन करताच परिवहन विभागाची वेबसाईट उघडून नवे भाडेदर तपासून पाहता येण्याची सोय आहे. परंतू अनेक टॅक्सी चालकांकडे नवा भाडे तक्ता नसल्याने प्रवाशांशी त्यांचे खटके उडत आहेत.

1 ऑक्टोबरपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ लागू झाली असून रिक्षाचे दर पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रूपयावरुन 23 रू. तर नंतर प्रत्येक किमीसाठी14.20 रू.वरून 15.33 रू. तर टॅक्सीचे दर पहिल्या 1.5 किमीसाठी 25 रू.वरून 28 रू. आणि नंतर प्रत्येक किमीसाठी 16.93 रू.वरून 18.66 पैसे केला आहे. आणि कुल कॅबसाठी पहिल्या 1.5 किमीसाठी 33 रू.वरून 40 रू. असा केला असून त्यापुढीस प्रत्येक किमीसाठी 22.26 रू.वरून 26.71 रू. करण्यात आला आहे.
मीटर रिकॅलिब्रेशन न केल्यास रिक्षा-टॅक्सी चालकांवर परवाना निलंबनासह दंडात्मक कारवाई होईल असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.