हे डोक्यातून वळवळणारे किडे, संशोधन करावं लागेल, संजय राऊत भडकले

बाबासाहेब आंबेडकर हे या महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत.

हे डोक्यातून वळवळणारे किडे, संशोधन करावं लागेल, संजय राऊत भडकले
संजय राऊत
| Updated on: Dec 16, 2022 | 5:28 PM

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत की नाही. आम्ही म्हणतो आहेत. ते महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. भाजपला बाबासाहेबांचं राजकारण करायला लाज वाटली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. अन्यथा जनता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. असं म्हटल्यावर कुणाला माफी हवी असेल, तर त्यांच्या डोक्यातल्या किड्यांचं संशोधन करावं लागेल. त्यांच्या डोक्यात नेकमे कोणते किडे वळवळताहेत. हे पाहावं लागेल, असा दमही संजय राऊत यांनी दिला.

बाबासाहेब आंबेडकर हे या महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचा आत्मा आहे. भाजपवाल्यांना कळत नाही का. महाराष्ट्रातील सरकार लवकर कोसळणार आहे. त्यामुळं यांना वैफल्य आलंय, असंही संजय राऊत म्हणाले.


भाजपनं लोकमताचा पाठिंबा यांनी गमावला आहे. लोकं यांच्या तोंडात शेण घालताहेत. मग असे काहीतरी उद्योग सुरू करायचे आणि महापुरुषांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून करायची, असा आरोपही संजय राऊत यांनी भाजपवर केला.

बाबासाहेब माझे प्रेरणास्थान

बाबासाहेब आंबेडकर यांची जी पुस्तकं भाजपकडं नसतील ती सर्व पुस्तकं माझ्याकडं आहेत. त्यांना काही गरज लागली तर माझ्याकडून घेऊन जावीत. डॉ. आंबेडकर यांचा मी जुना अभ्यासक आहे. शालेय जीवनापासून मी त्यांचा अभ्यासक आहे. ते माझं प्रेरणास्थान आहे. आम्हाला भाजपकडून माहिती उधार घ्यायची गरज नाही, असंही संजय राऊत यांनी भाजपला सुनावलं.

यामुळं वारकरी संप्रदायाची बदनामी होते

वारकरी संप्रदायाविषयी आम्हाला नितांत आदर आहे. पण, भाजपचा एक गट हे सगळं करतं. वारकरी संप्रदायाची बदनामी होते. भाजप पुरस्कृत वारकरी संप्रदायातली काही लोकं आहेत. ती ही सारी बदनामी करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.