विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत

तिन्ही मुलं विरार डोंगरपाडा येथील असून तिघेही दारु पिऊन समुद्रात उतरले असल्याचे जीवरक्षकाने सांगितले.

विरारच्या समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले, जीवरक्षकाशीच हुज्जत
| Updated on: Aug 16, 2020 | 12:41 PM

विरार : विरारमधील समुद्रात बुडणाऱ्या तिघांना जीवरक्षकाने प्राण धोक्यात घालून वाचवले. मात्र दारुच्या नशेत समुद्रात उतरलेल्या तिघांची भलतीच अरेरावी पाहायला मिळाली. कारण या तिघांनी आपला जीव वाचवणाऱ्या देवदूताशीच हुज्जत घातली. (Three Men saved from drowning in Virar Rajodi Sea)

स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी 06:15 ते 06:30 वाजताच्या सुमारास विरारमधील राजोडीच्या खोल समुद्रात हे तिघे तरुण पोहत होते. राजोडी वॉचटॉवर येथून दक्षिण दिशेला 500 मीटर अंतरावर हे तिघे होते. जीवरक्षक चारुदत्त मेहेर धावत खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात गेले. प्रसंगावधान दाखवत मेहेर यांनी तिघाही तरुणांना सुरक्षित बाहेर काढले.

समुद्रातून बाहेर काढल्यानंतर दारूच्या नशेत तरुणांनी जीवरक्षकाशीच हुज्जत घातली. आपले प्राण वाचवल्याबद्दल आभार किंवा कृतज्ञता व्यक्त करणे राहिले दूरच उलट त्यांनी या देवदूतावरच अरेरावी केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा : अर्नाळा समुद्रकिनारी क्रिकेटचा डाव, पोलिसांची गाडी पाहून क्रिकेटपटूंच्या समुद्रात उड्या

तिन्ही मुलं विरार डोंगरपाडा येथील असून तिघेही दारु पिऊन समुद्रात उतरले असल्याचे जीवरक्षकाने सांगितले. प्रसंगावधान राखल्याने तिघांचाही जीव वाचला. राहुल पाटील, प्रदीप झा, शुभम झा अशी या तरुणांची नावे आहेत.

दरम्यान, अरेरावी करणाऱ्या एका तरूणाला स्थानिक नागरिकांनी चोपही दिला. मात्र जीवरक्षक प्रसंगावधान दाखवून वेळेवर पोहचले नसते, तर यातील एखादा तरुण जीवास मुकला असता, असे बोलले जात आहे.

गेल्याच महिन्यात तरुणांचा ग्रुप अर्नाळा समुद्र किनारी क्रिकेट खेळत होता. मात्र अचानक सागरी पोलिसांनी या भागात एंट्री केली आणि त्यांची भंबेरी उडाली. तरुणांनी हातातील बॅट जागीच सोडून धूम ठोकली. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही जणांनी चक्क समुद्रात उड्या मारल्या. त्यानंतर पोहत पोहत या तरुणांनी होडीचा आधार घेत पोलिसांपासून पडणारा मार वाचवला. (Three Men saved from drowning in Virar Rajodi Sea)