Sanjay Raut: नायकांचा खून कोणी केला? अंकुश राणेंचा मारेकरी कोण? संजय राऊतांनी राणेंविरोधात मोर्चा उघडला
Sanjay Raut on Rane : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवीन अपडेट आल्यापासून राजकारण तापले आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांची नावं असल्याचे समोर आल्यानंतर राजकीय द्वंद वाढले आहे. आज खासदार संजय राऊत यांनी राणेंविरोधात मोर्चा उघडला आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) दाखल केलेल्या गुन्ह्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांची नावे असल्याचे समोर आले. त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींमागे मंत्री राणे असल्याचा आरोप केला आहे. तर कोकणातील जुन्या राजकीय हत्येचा उल्लेख करत त्यांनी राणेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे यांच्या बदनामीसाठी नेपाळी गँगकडून फंडिग होत असल्याची टीकाही राऊतांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत केली.
नेपाळी गँगकडून फंडिग
आदित्य ठाकरेंनी निवेदन दिलं आहे. जी व्यक्ती मृत व्यक्तीला कधी भेटली नाही, संबंध आला नाही, त्याच्यावर तुम्ही चिखलफेक करत आहे. यामागे कोण आहे मला माहीत आहे. कुठून अर्थ पुरवठा होतोय हे माहीत आहे. मध्ये हे जे कोण बॅरिस्टर जास्त बोलत आहेत, त्यांची कुंडली बाहेर येईल. ठाकरे यांच्या बदनामीसाठी नेपाळी गँगकडून फंडिग होत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला
राणेंवर राऊतांचे गंभीर आरोप
खरं म्हणजे तुम्हा सर्वांना अटक व्हायला पाहिजे होती. गेल्या २० वर्षात कणकवली जेवढे खून झाले त्याबाबत. गोवेकरचा खून झाला. अंकुश राणेंचा झाला. सत्यविजय भिसेंचा झाला. नाईकांचा झाला. किती नावे घ्यायची. यांच्या अंगावर आणि हाताला रक्त लागलं आहे. जीभेला रक्त लागलं आहे. त्यामुळे ते दुसऱ्यांबाबत असं भाष्य करतील. म्हणून तुम्हाला खून पचवण्यासाठी आणि दाबण्यासाठी सत्तेची गरज लागते. हे आम्ही बोललो तर काय होईल? नायकांचा खून कोणी केला. कोणी केला? सत्यविजय भिसेला कोणी मारले. अंकूश राणेंचा खरा मारेकरी कोण. सांगा ना? गोवेकरला किडनॅप करून कुठे नेलं. कोण मारेकरी होते. याचा निष्पक्ष तपास झाला असता तर हे लोकं बोलायला उरले नसते, असे गंभीर आरोप मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता राऊतांनी केले.
प्रकरणं दडपली तुम्ही. सीबीआय, महाराष्ट्राचे पोलीस असो तपास यंत्रणा तुम्ही ताब्यात घेतल्या. हे उकरायचं म्हटलं तर उकरू शकतो. पण प्रत्येकाची अब्रू असते. पुराव्याशिवाय बोलू नका. जर कोर्ट म्हणतंय, या क्षणी कोणी आरोपी नाही, कुणाला टार्गेट करता येत नाही, असं असताना हे उपटसुंभाने हा खेळ मांडला. कशासाठी मांडला आहे? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.