निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? : विजय वडेट्टीवार

| Updated on: Nov 10, 2020 | 8:56 PM

ओबीसी गोलमेज परिषदेला उपस्थित राहिल्याने विरोधकांनी केलेल्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? : विजय वडेट्टीवार
Follow us on

मुंबई : ओबीसी गोलमेज परिषदेला उपस्थित राहिल्याने विरोधकांनी केलेल्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला आहे. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला आहे.

विजय वड्डेट्टीवार म्हणाले, “एखाद्या नेत्याने मराठा समाजासाठी मेळावा घेतला तर तो ओबीसीच्या विरोधात आहे असा अर्थ होईल का? मी ओबीसी आहे आणि ओबीसीसाठी येथे आलो आहे, तर विरोधकांच्या आरोपांचा काहीही संबंध येत नाही. निवडणुकीच्या काळात समाजाचे मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागायला जाताना लाज वाटत नाही का? त्यावेळी राज्यघटना, अधिकार, जबाबदारी नसते का? हे नेते मतांच्या ओंजळीसाठी निवडणूक आली की मग समाजा-समाजाचे मेळावे घेतात. त्यावेळी त्यांना काय म्हणून हिणवाल?”

“आज 382 जाती आहेत. यातील अनेक भटक्या जमाती, विमुक्त भटक्या जमाती, ओबीसी, एसबीसी या समाजाने धोरण ठरवण्यासाठी गोलमेज परिषद घेतली असेल आणि मी तेथे आलो असेल तर आरोपाचा काहीही संबंध नाही,” असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्यातील सरकारी नोकर भरतीविषयी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “रखडलेल्या भरत्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे. आमचा भरती प्रक्रिया व्हावी हा आग्रह कालही होता आणि आजही आहे. मी कोणत्याही समाजाचं नुकसान होईल अशा अनुषंगाने भूमिका घेत नाही. अनेक वर्षांपासून भरत्या रखडल्यामुळे तरुणांचं आयुष्य टांगणीला लागलं आहे. त्यासंदर्भात बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. लवकरच मी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्याबाबत विनंती करणार आहे.”

अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही याबाबत स्पष्टता आणावी, यासाठी त्यांच्याशी बोलणार का असा प्रश्न वडेट्टीवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मराठा समाज ओबीसीत यायचा काहीही विषय नाही. कारण त्यांना एसईबीसी प्रवर्गातून अगोदरच आरक्षण दिलेलं आहे. परंतु तरीदेखील काहीजण असे प्रयत्न करत आहेत. त्यांची भूमिका मराठा-ओबीसी भांडणं लावण्याची आहे.

“समाजाच्या मेळाव्याला आलो म्हणून मी जातीवादी कसा?”

“आम्ही सर्वजण एकत्र आलो, तर बिघडलं कुठं? समाजाची परिषद सुरु आहे. त्याठिकाणी अडचणी मांडल्या जात आहेत. अशा ठिकाणी मी आलो म्हणून मी जातीवादी कसा? 7 डिसेंबरला भायखळा ते विधानभवन ओबीसी समाजातील नेते मोर्चा काढणार आहेत. यांचं निवेदन घेण्याचं काम ओबीसी समितीचा मंत्री म्हणून मी करेल. महाज्योतीला 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच महाज्योतीच्या उदघाटनाचा कार्यक्रम होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाज्योतीचं काम सुरु होईल,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

‘रेल्वेला 4 पत्र लिहूनही रेल्वे सुरु नाही’

वडेट्टीवार म्हणाले, “आत्तापर्यंत आम्ही रेल्वेला 4 पत्रं दिली आहेत. आम्ही सर्व पूर्तता करायला तयार आहोत. तसा ड्रफ्ट देखील त्यांना पाठवला आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत. आता चेंडू रेल्वेमंत्री आणि त्यांचा विभाग यांच्या कोर्टात आहे.”

हेही वाचा :

ओबीसींना संविधानाने दिलेला अधिकार मागण्याचा हक्क; संविधानाच्या पलिकडे जाणं चुकीचं : विजय वडेट्टीवार

राज्य सरकार आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी

क्रेडिट घेण्यासाठीच लोकल सुरू करण्यास टाळाटाळ; वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर आरोप

संबंधित व्हिडीओ :