वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी जमवणारा अटकेत, नवी मुंबईत विनय दुबेला बेड्या

| Updated on: Apr 15, 2020 | 9:16 AM

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. त्याच्या आवाहनामुळेच काल बांद्र्यात गर्दी जमल्याचा आरोप आहे. (Vinay Dubey arrested for protest of migrant labourers at Bandra Station)

वांद्रे स्टेशनबाहेर मजुरांची गर्दी जमवणारा अटकेत, नवी मुंबईत विनय दुबेला बेड्या
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर एकत्र जमवणाऱ्या विनय दुबेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. नवी मुंबईतील ऐरोलीतून दुबेला कालच रात्री (मंगळवार 14 एप्रिल) अटक करण्यात आली. आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी रेल्वेची मागणी करत हजारोच्या संख्येने मजूर काल वांद्र्यात जमले होते. (Vinay Dubey arrested for protest of migrant labourers at Bandra Station)

विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. त्याच्या आवाहनामुळेच काल बांद्र्यात गर्दी जमल्याचा आरोप आहे. दुबेसह 1 हजार अज्ञातांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वांद्रे परिसरात काल दुपारनंतर जवळपास 4 हजार मजुरांचा जमाव जमल्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमाव आल्याने नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. या प्रकारानंतर वांद्रे रेल्वे स्थानक मुंबई महापालिकेने सॅनिटाइज केलं आहे.

नेमकं काय झालं?

वांद्रे येथे हजारोच्या संख्येने जमा झालेले कामगार मागील अनेक दिवसांपासून जवळच्याच वस्तीमध्ये राहतात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे आपली प्रचंड गैरसोय आणि हालअपेष्टा होत असल्याची कैफियत या कामगारांनी मांडली. हे टाळण्यासाठीच आपल्या मूळगावी जाण्याचा हट्ट ते करत होते. त्यासाठीच ते वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर असलेल्या बस डेपो परिसरात जमा झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बाहेर राज्यातील नागरिकांना चिंता न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. तुम्ही परराज्यातून आले आहात, पण तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात, असा विश्वासही त्यांनी मजुरांना दिला. ‘कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी उसळली. गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका, असंही उद्धव ठाकरे यांनी बजावलं.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“वांद्रे स्थानकातील परिस्थिती किंवा सूरतमधील दंगल, यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. स्थलांतरित कामगारांना अन्न-पाणी किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परतायचं आहे. कामगारांची घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास केंद्र सरकार सक्षम नसल्याचाच हा परिणाम आहे” असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

‘लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून रेल्वे बंद आहेत. मात्र स्थलांतरित कर्मचारी घरी पोहोचावेत, यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे आणखी 24 तास रेल्वे चालू ठेवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. स्थलांतरित कर्मचाऱ्यांसाठी योजना आखण्याची विनंती केली होती.’ असंही ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी म्हणाले, “कामगारांना घरी जायचं आहे. मुंबईत एका घरात 12 ते 15 जण एकत्र राहत आहेत. मुंबईत राहून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होतच आहे. त्यापेक्षा आम्ही घरीच जातो, असं या लोकांचं म्हणणं आहे. या लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवत आहोत. यावर मार्ग कसा निघेल याबाबत प्रशासनाशी आमचं बोलणं सुरु आहे. आम्ही प्रयत्न करतोय की एखादी अशी जागा निश्चित व्हावी, जिथे ते आरामशीर राहू शकतात. या लोकांना समजवण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला. पण ते आम्ही चालत घरी जाणार असं म्हणत आहेत. हे कामगार बंगाल आणि बिहारचे आहेत.”

या लोकांना एकत्रित कुणी आणलं होतं? : आशिष शेलार

भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, “या ठिकाणी दोन ते अडीच तासापासून मोठा मॉब एकत्रित आला होता. या सर्वांबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस बोलत होते. त्यांना शांतेतचं आवाहन करत होते. मी स्वत: एक तासापासून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व लोक बांद्रा पूर्व, पश्चिम, खार पूर्व या भागातून एकत्र आले होते. प्रश्न हा आहे की या लोकांना एकत्रित कुणी आणलं होतं? याच्यावर सरकारचं लक्ष होतं का? इंटेलिजन्स काय करत होते? त्यांची खदखद का बघितली नाही? या सर्व गोष्टींवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या लोकांनी शांततेने आणि धैर्याने घ्यावं’ असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र, 21 दिवसात प्रशासनाला ‘कोराना’वर ताबा मिळवता आला नाही. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजारांपार गेली. मुंबईत तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजारच्याही पुढे गेली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन वाढीला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी वांद्रे येथे हजारोंची गर्दी

चिंता नको, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मुख्यमंत्र्यांचा मजुरांना शब्द

मजुरांना अन्न-पाणी नको, घरी जायची सोय हवी, आदित्य ठाकरेंचं मोदी सरकारकडे बोट

इतक्या लोकांना एकत्र कुणी आणलं? गुप्तचर यंत्रणा कुठे आहेत? : आशिष शेलार

वांद्रेतील कामगारांच्या उद्रेकानंतर अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन

Extended Lockdown : वांद्र्यातील गर्दी ते आगीचे बंब, टास्क फोर्स ते तज्ज्ञ समिती, मुख्यमंत्र्यांचे 10 महत्त्वाचे मुद्दे

(Vinay Dubey arrested for protest of migrant labourers at Bandra Station)