भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं; विनायक राऊतांचा जहरी वार

| Updated on: May 26, 2021 | 4:10 PM

मातोश्रीत शांती यज्ञ करण्याचा सल्ला देणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. (vinayak raut slams narayan rane over cm uddhav thackeray konkan visit)

भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलं; विनायक राऊतांचा जहरी वार
शिवसेना खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई: मातोश्रीत शांती यज्ञ करण्याचा सल्ला देणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे, अशी जहरी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. (vinayak raut slams narayan rane over cm uddhav thackeray konkan visit)

खासदार विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंवर जोरदार टीका केली. भाजपनं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलेले आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयातच आरटीपीसीआरसाठी जादा पैसे घेतले जातायत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे. त्यांचा अनुभव हा भ्रष्टाचारातून आलेला आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

ही तर दैवतांची घरे

राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणं त्यांना शोभत नाही, असा पलटवारही त्यांनी केला. आता यापुढे आम्ही राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आहोत. सिंधुदुर्ग भवन कसं बनलं, कोकणवासीयांना फसवून भूखंड कसं लाटला हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्येच असलेल्या बेबनावाबाबतही राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न ज्येष्ठ नेते सोडवतील. त्यातून ते नक्कीच मार्ग काढतील, असं ते म्हणाले. आघाडी सरकार स्थिर आणि भक्कम आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. कुठलीही समस्या असली तरी त्यातून मार्ग काढला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचं आणि कुणाला गणपती करायचं हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, शांती यज्ञही करा, असं सांगतानाच राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, अशी टीका राणेंनी केली होती.

मुख्यमंत्री लायक नाही

राज्यासाठी हे मुख्यमंत्री लायक नाहीत. त्यांच्या कोकण दौऱ्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुष्काळ, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात घरोघरी जावं लागतं. पंचनामे करावे लागतात, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री ज्या विमानतळावर उतरले ते विमानतळ आधी सुरू करा. ज्या विमानतळाला परवानगी नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्री उतरतातच कसे?, असा सवाल ही राणेंनी केला होता. (vinayak raut slams narayan rane over cm uddhav thackeray konkan visit)

 

संबंधित बातम्या:

कोकणाला 200 कोटींचं पॅकेज द्या, औषधांच्या टेंडरमध्ये घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा पिकनिक दौरा; नारायण राणेंचे प्रहार

‘श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या’

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

(vinayak raut slams narayan rane over cm uddhav thackeray konkan visit)