चिपी विमानतळाच्या लोकार्पणापूर्वीच मानापमान नाट्य?; दरेकर म्हणतात, फडणवीस आणि मला कार्यक्रमाचं साधं निमंत्रणही नाही

| Updated on: Oct 08, 2021 | 1:46 PM

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. (pravin darekar)

चिपी विमानतळाच्या लोकार्पणापूर्वीच मानापमान नाट्य?; दरेकर म्हणतात, फडणवीस आणि मला कार्यक्रमाचं साधं निमंत्रणही नाही
प्रवीण दरेकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना या कार्यक्रमाचं अद्यापही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चिपीच्या लोकार्पण सोहळ्यावरून मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

मलिक दबाव निर्माण करताहेत

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या टीकेचाही समाचार घेतला. तपास यंत्रणांपेक्षा मला जास्त काही तरी माहिती आहे अशा अविर्भावात मलिक बोलत असून ते राजकीय हेतूने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवाब मलिक यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी ती संबंधित यंत्रणांकडे द्यावी. प्रसारमाध्यमांवर वेळ घालवण्यापेक्षा ते इनपुट एनसीबीला द्यावे, असं दरेकर म्हणाले.

मलिकांना पोटशूळ

मलिक आणि एनसीबी यांचं नातं सर्वश्रूत आहे. मलिक यांना एनसीबीबद्दल पोटशूळ आहे. एनसीबी विंगने या संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे. वारंवार एनसीबीवर आरोप करून देशातील तपास यंत्रणेबद्दल अशी भूमिका घेणे चांगले नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पुराव्याच्या आधारेच कारवाई

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. असं म्हणण्याचं कारण नाही. अजित पवारांवर गेले चार ते पाच महिने इन्कम टॅक्स माहिती गोळा करत होतं. त्यात त्यांना जे पुरावे मिळाले त्या आधारावर ही कारवाई करण्यात येत आहे. लखीमपूर प्रकरणात बाजू घेण्याचे कारण नाही. परंतु महाराष्ट्रात सुद्धा आदिवासी गोवारी हत्याकांड असेल किंवा अशा अनेक घटना घडल्या त्यावेळी कोणी काय भूमिका घेतली हे जनतेने पाहिली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

तीच आमची भूमिका

अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे राजकीय भावनेने काम करणे योग्य नाही. पण तपास यंत्रणांना जर काही पुरावे मिळाले असतील तर ते कुठल्याही पक्षाचा अधिकारी असो चौकशी केली गेली पाहिजे. तीच भूमिका आमचीही आहे, असंही ते म्हणाले.

शिवसेनेला चिमटा

जनता त्या त्या वेळी निर्णय घेत असते. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्षांची बाजू भक्कम पणे मांडणाऱ्या भाजपला जनतेने क्रमांक एकचा पक्ष बनवला. तसेच मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला चौथ्या क्रमांकावर नेऊन ठेवला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

संबंधित बातम्या:

मला भाजपने ईडीची नोटीस दिली, लोकांनी भाजपला येडी ठरवली : शरद पवार

VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले

अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात

(we don’t get invitation of chipi airport inauguration, says pravin darekar)