Rajya Sabha Election : मनसे कुणाच्या बाजूने? महाविकास आघाडी की भाजप की तटस्थ?; राज ठाकरे घेणार निर्णय

| Updated on: Jun 05, 2022 | 6:49 PM

Rajya Sabha Election : मनसे कुणाला पाठिंबा देणार ही चर्चा सुरू असतानाच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सूचक ट्विट केलं आहे. चिंता नसावी, आमच्यासाठी राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.

Rajya Sabha Election : मनसे कुणाच्या बाजूने? महाविकास आघाडी की भाजप की तटस्थ?; राज ठाकरे घेणार निर्णय
इगो बाजुला ठेऊन विचारलं असतं तर राज ठाकरेंनी विचार केला असता, मनसे आमदाराचा शिवसेनेला टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर आता छोट्या छोट्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीसोबत असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने भाजपला (bjp) मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, समाजवादी पार्टीने मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमने आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. तर मनसेनेही (mns) आपले पत्ते खोलले नाही. राज्यसभेच्या निवडणुकीतील सहा जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडे आवश्यक मते नाहीयेत. या दोन्ही पक्षांची संपूर्ण मदार छोटे पक्ष आणि अपक्षांवर आहे. त्यामुळे अपक्ष आणि हे छोटे पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेचा राज्यात एकच आमदार आहे. पण राज्यसभा निवडणुकीत मनसेलाही महत्त्व आलं आहे. त्यामुळे मनसे काय भूमिका घेते याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

 

हे सुद्धा वाचा

सूचक ट्विट, अर्थ काय?

मनसे कुणाला पाठिंबा देणार ही चर्चा सुरू असतानाच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सूचक ट्विट केलं आहे. चिंता नसावी, आमच्यासाठी राजसाहेबांचा आदेश प्रमाण आहे. आणि मी माणूस आहे, घोडा नाही, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे. या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. एक म्हणजे मनसे या घोडेबाजारात सामील होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. दुसरं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीत कुणाला मतदान करायचं याचा निर्णय फक्त राज ठाकरे घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मग नॉट रिचेबल का?

राज्यसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस बाकी असतानाच मनसेचे नेते राजू पाटील हे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मी घोडा नाही असं पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मग नॉट रिचेबल राहण्याचं कारण काय? राज ठाकरेच अंतिम निर्णय घेणार आहेत तर मग आमदार नॉट रिचेबल का आहे? असा सवाल केला जात आहे. पाटील हे स्वत: नॉट रिचेबल झालेत की कुणाच्या आदेशाने झालेत अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

राज की बात काय?

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपचे गोडवे गाणं सुरू केलं आहे. शिवया आगामी काळात महापालिका निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राजकीय गणितं जुळवण्यासाठी काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.