राजकारणातील रिअल हिरो कोण? देवेंद्र फडणवीसांनी घेतलं या व्यक्तीचं नाव; सांगितलं त्यामागचं कारण

देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय कुमारला दिलेल्या FICCI मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचे 'रिअल हिरो' म्हटले. मोदींनी १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि भारताला 'फ्रॅजाईल फाईव्ह'मधून जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवले, असे फडणवीस म्हणाले.

राजकारणातील रिअल हिरो कोण? देवेंद्र फडणवीसांनी घेतलं या व्यक्तीचं नाव; सांगितलं त्यामागचं कारण
| Updated on: Oct 07, 2025 | 2:56 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) साठी एक विशेष मुलाखत दिली. विशेष म्हणजे, ही मुलाखत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने घेतली. या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील रिअल हिरो कोण, असा प्रश्न विचारला, ज्यावर देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिले.

रिअल हिरो कोण?

आज जर आपण भारताला पाहिलं, तर भारताच्या पूर्ण राजकीय इतिहासात आम्हाला रिअल हिरोच्या रुपात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतात. कारण ते जे बोलतात तेच करतात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचे कौतुक केले. आपण पाहिले तर भारतात गरीबी हटाओ अशी घोषणा वारंवार देण्यात आली. पण १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम हे मोदींनी केले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपण ‘फ्रेजाइल फाइव्ह’ इकोनॉमीतून पहिल्या पाच इकोनॉमीत आलो आहोत. आता आपण जगभरातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. यानंतर आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थाही बनलो आहोत. आज टेक्नोलॉजी, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचे क्षेत्र असो किंवा मग AVGC चे क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात भारत हा जगाशी स्पर्धा करत आहे. त्यामुळे मला असे वाटते की आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा भारत देश किती महान होता, याची गोष्ट ऐकत आलो आहोत. पण भारत महान कधी होणार हे आपल्याला कोणीही सांगत नव्हते. आता आपल्याला माहिती आहे की आपण त्या मार्गावर चालत आहोत. २०४७ मध्ये विकसित भारताचे चित्र हे आता आपल्या समोर आहे. ते चित्र उभं करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भारतात गुंतवणुकीसाठी कंपन्यांना आकर्षित कसं कराल?

यावेळी अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीसांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांना आकर्षित करायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल? असे विचारले. मी त्यांना सांगेल की एवढी मोठी लिगसी आहे. आम्ही दादासाहेब फाळके पासून आजच्या कंटेट क्रिएटरपर्यंत आपली जी वरची पोझिशन आहे. ती कधी सोडली नाही. महाराष्ट्रच अशी जागा आहे की, रिअल सेन्समध्ये एंटरटेन्मेंटची राजधानी आहे. ज्यांना महाराष्ट्रात यायचं त्यांनी यावं. कारण इथे केवळ इको सिस्टिम नाहीये. तर इथे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी सिनेमा जगला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us