विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?; दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्टच सांगितलं

| Updated on: Jun 02, 2023 | 7:18 AM

येत्या 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मोठा दावा करण्यात आला आहे. विरोधकांनी 450 जागांवर एकास एक उमेदवार दिला तर भाजपचा पराभव होऊ शकतो, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?; दैनिक सामनाच्या अग्रलेखातून स्पष्टच सांगितलं
nitish kumar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत विजय मिळवण्यासाठी भाजप आणि विरोधक कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाहीये. त्यामुळे विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? असा सवाल केला जात आहे. या सवालाला दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आलं आहे. आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा संविधान आणि भारतमाता हाच आहे. लोकांमधून नेता निर्माण होईल. रावणराज्याचा अंत होण्यासाठी वानरसेनाही बरोबर घ्यावी लागेल, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या गणिताची जुळवाजुळव आतापासूनच सुरू झाली आहे. केवळ भाजपच नव्हे तर विरोधकांनीही ही जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची सतरंजी खेचली जात आहे. कर्नाटकातील निकाल भाजपसाठी धक्कादायक होते. त्यामुळे मोदी आणि शाह यांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. या निकालानंतर भाजपला दक्षिणेतील एकमेव दरवाजा बंद झाला आहे, असं सांगतानाच नव्या संसंदेत सेंगोल आणला तरी तामिळनाडूतील जनता द्रमूक सोडून भलत्यासलत्यांच्या मागे पळत नाही, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून सुनावलं आहे.

हे सुद्धा वाचा

अग्रलेखातील दावे प्रतिदावे जशास तसे

दक्षिणेत भारतीय जनता पक्षाने कर्नाटक हे एकमेव राज्य गमावले हा 2024 च्या तोंडावर अपशकुन आहे. पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे एका शिंद्यांस काँग्रेसमधून पडून भाजपने मध्य प्रदेशात सरकार बनवले. ते कमालीचे अलोकप्रिय ठरले आणि भाजप त्यामुळे गाळात जात आहे. छत्तीसगढ पुन्हा काँग्रेसकडेच जाईल. राजस्थानात जादूगार अशोक गेहलोत भाजपास सहजासहजी पुढे जाऊ देणार नाहीत. हे चित्र जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे द्योतक आहे.

मोदी-शहा या दुकलीविरोधात देशभरात संताप आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये सोडली तर मोदी-शहांच्या विरोधात संपूर्ण देश उभा ठाकला आहे. राज्यातील प्रादेशिक पक्षांना व त्यांच्या छत्रसालांना एकत्र बांधण्यासाठी प्रत्येक जण शर्थ करीत आहे.

नितीश कुमार यांनी पाटण्यात 12 जून रोजी भाजप वगळून देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी बाहेर पडतील. राजकारणातील सध्याचे गुजरात मॉडेल राष्ट्रहिताचे नाही. सर्वच प्रमुख सरकारी पदांवर, आर्थिक पेढ्यांवर एकाच राज्यातील लोकांची नेमणूक केली जात आहे आणि देशाचा सर्व आर्थिक ओघ एकाच राज्यात वळवला जात आहे. त्यामुळे ‘गुजरात विरुद्ध संपूर्ण देश’ असा संघर्ष उभा राहिला तर त्याचे खापर मोदी-शहांवर फुटेल.

एकाच राज्यात आणि त्यातील लोकांकडे सर्व आर्थिक सत्ता एकवटून मोदी व शहा सरळ ‘भेद’ करीत आहेत. 2024 च्या प्रचारात हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. गुजरातने शंभर टक्के लोकसभेच्या जागा भाजपास दिल्या तरी काही खरे नाही, पण विधानसभेप्रमाणे ‘आप’ ने गुजरातेत चढाओढ केली नाही तर भाजपास पैकीच्या पैकी जागा मिळणार नाहीत. उत्तर प्रदेशात मायावतींचा मासा भाजपच्या गळास लागला आहे, पण राहुल गांधी यांनी एक स्वतंत्र मोहीम उत्तरेत राबवली तर चित्र बदलू शकेल. अखिलेश यादव काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा समंजसपणा दाखवला तर ‘हिंदू-मुसलमान’ दंगलींचा फंडा योगी राज्यात चालणार नाही.

लोकांना पर्याय हवा आहे. भाजप हा अजिंक्य नाही. मोदींचा पराभव होऊच शकत नाही हा भ्रम तुटू लागला आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हे स्थान भाजपचे उरलेले नाही. देशात 36 राज्ये आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, गुजरात, हरयाणा, मणिपूर, अर्धेमुर्धे महाराष्ट्र ही राज्ये सोडली तर भाजपच्या नावे सगळा ठणठण गोपाळ आहे. बिहार, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तामीळनाडू, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड अशा राज्यांत भाजप किंवा मोदी नाहीत.

पी. चिदंबरम यांनी जे गणित मांडले ते सत्य आहे. देशातील 450 जागांवर भाजपविरोधात एकास एक लढत झाली तर चित्रच बदलेल. पश्चिम बंगालसारखी मोठी राज्ये, हरयाणा-तेलंगणासारखी मध्यम, ईशान्येकडील छोट्या राज्यांत भाजपच्या दहापाच व एकदोन जागा कमी झाल्या तरी किमान शंभर जागांचा फटका बसेल आणि हा 05 आकडा भरून देण्यास कोणीही माईचा लाल पुढे येणार नाही.

मोदी- शहा प्रवृत्तीचा पराभव घडविण्यासाठी जनतेने मन बनवले आहे. देशभक्त पक्षांनी कपाळकरंटेपणा करू नये. मोदी नाही तर कोण? राहुल गांधी मोदींसमोर टिकणार नाहीत. मोदी यांना राहुलमुळे विजय मिळतो वगैरे भ्रामकांतून सगळ्यांनी बाहेर पडायला हवे. मोदींना आव्हान आता राहुल गांधींचेच वाटत आहे हे मोदी-शहांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. मोदी हेच भाजपच्या दारुण पराभवाचे कारण ठरतेय. अमित शहा त्या पराभवास हातभार लावतील.