Raj-Uddhav Alliance : ठाकरे बंधु एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाहीत? त्यांना नाकारलं कोणी? कुठे कमी पडले? पुढे एकत्र राहतील का?
Raj-Uddhav Alliance BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीचा महापौर बसणार हे स्पष्ट आहे. या निवडणुकीत एकत्र येऊनही ठाकरे बंधु का जिंकू शकले नाहीत? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.

मुंबई महानगरपालिका फक्त देशातच नाही तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका आहे. या मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. फक्त BMC च नाही, तर महाराष्ट्रातील 29 पैकी 25 महापालिका जिंकून भाजपने ठाकरे बंधुंसह संपूर्ण विरोधी पक्षाला हरवलं. आता प्रश्न हा आहे की, बाळासाहेबांच्या वारसा, त्याचं पुढे काय होणार? राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचं काय होणार? या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालामागचा अर्थ समजून घेऊया. महापालिका निवडणूक निकालाची सर्वात मोठी बाब म्हणजे 25 वर्षानंतर इथे शिवसेनेचा किल्ला ढासळला आहे.
बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचा, बीएमसीत राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कारण जे अस्तित्व वाचवण्यासाठी 20 वर्षानंतर ठाकरे बंधुंनी हातमिळवणी केली, ती पूर्णपणे मुंबईच्या जनतेने मान्य केलेली नाही. 25 वर्षानंतर मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे, तर राज ठाकरे यांची मनसे दोन आकडी जागाही मिळवू शकली नाही.
ठाकरे बंधुंना कोणी-कोणी नाकारलं?
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जोडीला एक ठराविक पट्टा सोडल्यास मुंबईच्या जनतेने पूर्णपणे स्वीकारलेलं नाही.
उत्तर भारतीयांविरुद्ध मनसेने केलेल्या हिंसाचाराचा परिणामही काही प्रमाणात दिसून आला. ठाकरे ब्रदर्स अमराठी मतदारांना सोबत जोडण्यात कमी पडले.
मुस्लिम मतदारांनी या दोघा बंधुंना स्पष्टपणे नाकारलं.
मागची 25 वर्ष महापालिका निवडणूक निकालानंतर मातोश्रीमध्ये जल्लोष असायचा. तिथे शुक्रवारी सन्नाटा होता. आता या निकालानंतर अनके प्रश्न निर्माण होतायत.
कुठले प्रश्न आहेत?
राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंच नुकसान झालं का?
काँग्रेसशी फारकत घेणं उद्धव ठाकरेंना महाग पडलं का?
पुढेही उद्धव आणि राज ठाकरे जोडी एकत्र राहिलं का?
कुठल्या मुद्यांमुळे अपयश?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली रणनिती बदलली. महाविकास आघाडीपासून ते लांब गेले. अनेक वर्षांचं शत्रुत्व विसरुन मनसेसोबत हातमिळवणी केली. पण आता उद्धव यांच्या राजकीय भवितव्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण जी रणनिती बनवली प्रत्यक्षात ती सत्ता मिळवून देऊ शकली नाही. बीएमसीमध्ये उद्धव यांच्याविरोधात आलेल्या निकालाचे अजूनही काही अर्थ आहेत.
मागच्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्थापितांविरोधात असलेल्या लाटेचं आव्हान होतं. उद्धव आणि राज यांनी जाहीर सभांऐवजी शाखाभेटी आणि पत्रकार परिषदांवर भर दिला. त्यामुळे म्हणावं तितक लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही. फक्त मराठी मतदारांवरच लक्ष देणं थोड महाग पडलं. कारण इतर मतदार त्यांच्यापासून दुरावला.
