उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख, मुंबईत योगी सरकारची जाहिरातबाजी

| Updated on: Dec 02, 2020 | 10:30 AM

मुंबईतील माहिम भागात बस स्थानकावर 'काम दमदार योगी सरकार' अशी जाहिरात लावण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख, मुंबईत योगी सरकारची जाहिरातबाजी
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जाहिरातबाजी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील फिल्मसिटी देशाची नवी ओळख होईल, असा विश्वास योगी सरकारच्या जाहिरातीतून व्यक्त करण्यात आला आहे. (Yogi Government Ad in Mumbai says Uttar Pradesh Filmcity will become new recognition of India)

मुंबईतील माहिम भागात बस स्थानकावर योगी सरकारची जाहिरात लावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सूचना आणि जनसंपर्क विभागाच्या जाहिरातीत ‘काम दमदार योगी सरकार’ असा नारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील फिल्मसिटी देशाची नवी ओळख होईल, असंही जाहिरातीत म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगींनी मंगळवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी मुंबईत दाखल होताच अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ नवी फिल्मसिटी उभारण्यात येत आहे.

“मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यांची भेट घेतली. चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा कामाप्रती त्यांचा ध्यास, चिकाटी आणि सर्जनशीलता तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे”, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलं.

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याच्या निर्णयाचं उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील कलाकारांकडून स्वागत केलं जात आहे. नव्या फिल्मसिटीच्या निर्माणामुळे हिंदी कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी काही कलाकारांनी आशा आहे. योगी आदित्यनाथ यांच्या पावलामुळे नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, अशी अनेकांना आशा आहे. (Yogi Government Ad in Mumbai says Uttar Pradesh Filmcity will become new recognition of India)

बॉलिवूड तोडण्याचा आरोप

दुसरीकडे, मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याचा घाट योगी सरकारने घातल्याची टीका होत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॉलिवूडला मुंबई आणि महाराष्ट्रापासून तोडणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. तर राज्यातील भाजप नेत्यांनी योगी सरकार बॉलिवूडला कुठेही नेत नसल्याचा दावा केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत दाखल होताच योगी आदित्यनाथ यांची अक्षय कुमारसोबत बैठक

उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण

कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा

(Yogi Government Ad in Mumbai says Uttar Pradesh Filmcity will become new recognition of India)