1000 किलोमीटर चालत ते मातोश्रीवर आले… ऊन, वारा, पावसाचीही तमा नाही; एकच ध्यास हुकूमशाहीला विरोध

| Updated on: Mar 30, 2023 | 1:59 PM

राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याच्या निषेधार्थ युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने महाभारत यात्रा सुरू केली आहे. रामटेकपासून ते मातोश्री अशी ही यात्रा सुरू करण्यात आली होती.

1000 किलोमीटर चालत ते मातोश्रीवर आले... ऊन, वारा, पावसाचीही तमा नाही; एकच ध्यास हुकूमशाहीला विरोध
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची चौकशी सुरू झाली आहे. तर काहींना तुरुंगात जावं लागलं आहे. तर काही लोक अजूनही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तपास यंत्रणांच्या याच कारवाईला विरोध करण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने महाभारत यात्रा सुरू केली आहे. रामटेकपासून ते मातोश्री अशी ही यात्रा सुरू करण्यात आली होती. हे तरुण हजार किलोमीटरचा प्रवास करून मातोश्रीवर आले आहेत.

युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे यांच्या नेतृत्वात ही महाभारत यात्रा काढण्यात आली. नागपूरच्या रामटेक येथून 21 मार्च रोजी ही यात्रा सुरू झाली. ऊन, वारा आणि अवकाळी पावसाची तमा न बाळगता आज ही यात्रा मुंबईत पोहोचली. यावेळी आधी या तरुणांनी शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर हे तरुण मातोश्रीवर पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या तरुणांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं निवेदन घेतलं आणि त्यांना मार्गदर्शनही केलं. यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई आणि संजय राऊत उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मातोश्री येथे महाभारत यात्रा पोहोचली असता स्थानिक पत्रकार बांधवांनी यात्रेचा विषय समजून घेतला. वेगवेगळे विषय मांडत आम्ही इथपर्यंत आलोय आणि यात्रेदरम्यान आम्ही हजारो लोकांचा कल यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतला, असं निहाल पांडे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय झालाय. शिवसैनिकांचं घर उद्ध्वस्त झालंय, अशी भावना राज्यातील जनतेने व्यक्त केली आहे. म्हणून त्या सर्व शिवसैनिकांचं घर वाचवण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ सन्मानार्थ आम्ही 1000 किलोमीटरचा प्रवास करत आज रामटेकवरून आम्ही मुंबई मातोश्रीपर्यंत आलोय, असं निहाल यांनी सांगितलं. हे तरुण मोठ्या संख्येने मातोश्री परिसरात आले. यावेळी या तरुणांनी जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

उद्धव ठाकरेंना झेंडा देणार

युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे 100 हून अधिक तरूण एक हजार किलोमीटरचा प्रवास करत मातोश्रीवर आले आहेत. ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. हुकूमशाहीविरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे. नागपूरच्या प्रसिद्ध राम मंदिरावरील भगवा झेंडा उद्धव ठाकरे यांच्या हाती दिल्याची  माहिती निहाल यांनी दिली.

त्या कटामागे देवेंद्र फडणवीस

सत्तेचा वापर करून शिवसेनेचं घर फोडण्यात आलं आहे. या कटकारस्थानाचा आम्ही निषेध करतो. या षडयंत्रामागे देवेंद्र फडणवीस आहेत. या सरकारने आमदारांचे दाम लावले. पण शिवसेना फुटली असली तरी सर्वसामान्य माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे, असा दावाही त्यांनी केला.