
सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. हीच बारावीची परीक्षा देण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहपा रोडवर ही घटना घडली. उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी पुलाजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहपा गावातील रहिवासी सुभाष केशव भिवणकर हे गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आपली मुलगी तन्वी सुभाष भिवणकर आणि तिची मैत्रीण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे यांना दुचाकीने उमरेड येथील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी निघाले होते. बारावीची महत्त्वाची परीक्षा असल्याने तिघेही वेळेत पोहोचण्याच्या तयारीत होते. मात्र, एमआयडीसी पुलाजवळ समोरून येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात सुभाष भिवणकर आणि त्यांची मुलगी तन्वी यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी वंशिका नरुळे ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची बातमी समजताच मोहपा आणि आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतापलेल्या जमावाने ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर याला पकडून बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर संतप्त नागरिकांनी ट्रकच्या केबिनला आग लावून आपला रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. यावेळी संतप्त जमावाने पोलीस वाहनावरही दगडफेक केली, ज्यात वाहनाचे नुकसान झाले आहे.
सध्या या परिसरात परिस्थिती तणावपूर्ण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. उमरेड पोलिसांनी याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका गुणवंत विद्यार्थिनीचा परीक्षेच्या दिवशीच असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.