नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Nagpur Protest : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशाच एका आंदोलनानंतर आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नागपुरात आंदोलकांची धरपकड
नागपूरच्या संविधान चौकात काक्रोज जनता पार्टीकडून सायंकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन करण्यात आले. काही कार्यकर्ते आंदोलनाची वेळ संपल्या नंतर निघून गेले, मात्र जवळपास 100 कार्यकर्ते आंदोलन स्थळी होते. पोलीसांनी कार्यकर्त्यांना आंदोलन स्थळावरून जाण्यासाठी सांगितले मात्र आंदोलकांनी जागा न सोडता घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी अखेरीस आंदोलकांना जागा खाली करण्यात 10 मिनिटे दिली होती, मात्र तरीही आंदोलकांनी जागा सोडली नाही, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामुळे काही काळा संविधान चौकात तणावाचे वातावरण पहायला मिळाले.
जंतर मंतरवर राडा
दिल्लीतील जंतर मंतरवर रात्री साडे आठच्या आसपास राडा झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या काही लोकांनी रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे. यात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या जंतर मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तलवार फिरवल्याचा आरोप
समोर आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी काही लोकांना तलवार फिरवली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळानंतर परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. यानंतर काही आंदोलनकर्ते कॅनॉट प्लेस आणि टॉलस्टॉय मार्गावर जमले होते. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याने ते निघून गेले. सध्या कॅनॉट प्लेस, टॉलस्टॉय मार्ग आणि जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.