
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोलर इंडस्ट्रीज (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट भीषण असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या एसबीएल कंपनीत पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी या कारखान्यातील काम सुरू होते. त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. तसेच या कारखान्याची मुख्य इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. यावेळी स्फोटामुळे कारखान्याचे अवशेष अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत उडाले. तसेच स्फोटानंतर इमारतीचा ढिगारा पडल्याने त्या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या या कंपनीत झालेल्या स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि कंपनीचे बचाव पथक ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे.
मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 1, 2026
या अपघातामुळे स्फोटक कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान या दुर्घटनेनंतर कंपनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारखान्यांच्या सुरक्षिततेचे निकष पाळले जात आहेत की नाही, याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. या भीषण घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.