पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून 10 हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

| Updated on: Jul 29, 2021 | 11:31 AM

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Vijay Wadettiwar)

पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून 10 हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती
मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us on

नागपूर: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या शुक्रवारपासून ही 10 हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (10 thousand rupees will distribute from tomorrow for emergency relief flood affected people, says Vijay Wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केले आहेत. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल अहवाल देण्यास सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात अहवाल मिळावा या सूचना दिल्या आहेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. हा प्राथमिक अंदाज आहे. नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागेल. हा सर्व परिसर इको सेन्सिटीव्ह झोन समजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबरोबर तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तौक्ते, निसर्ग वादळ, विदर्भ पुराचेही पैसे मिळावेत

केंद्र सरकारने 700 कोटी रुपये दिले ते गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरच्या पुराचे आहेत. म्हणजे लोकांमध्ये गैरसमज झाला. बघा पूर आला आणि पैसे दिले. ठिक आहे. पण आभार मानलेच पाहिजे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आला होता. त्याचे हे पैसे आहेत. आम्ही 3721 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले 700 कोटी मिळाले. तौक्ते, निसर्ग वादळ आलं, विदर्भात महापूर झाला त्याचीही अजून मदत मिळाली नाही. या सर्व संकटात 420 आणि 721 कोटी राज्याला मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत 1141 कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा आहे. हे संकट मोठे आहे, असं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात यावं

पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम तातडीने यावी. आम्ही पत्र पाठवत आहोत. नुकसान मोठं आहे. त्यामुळे केंद्राने स्वत:हून टीम पाठवावी. नेते, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते फिरत आहेत. त्यांनीही पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती द्यावी. पंतप्रधानांनीही येऊन पाहणी करावी. पंतप्रधानांनी दौरे करावेत. गुजरातमध्ये काही झालं तर ते लगेच जातात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. आमची इच्छा आहे. त्यांनी सुद्धा कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट आलं ते पाहावं, त्यांना कळेल संकट किती मोठं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. (10 thousand rupees will distribute from tomorrow for emergency relief flood affected people, says Vijay Wadettiwar)

 

संबंधित बातम्या:

सरकारमध्ये आंतरविरोधाला सुरुवात, सध्या एक्स्ट्राऑर्डिनरी संकट, एक्स्ट्राऑर्डिनरी निर्णय घ्या : देवेंद्र फडणवीस

उत्तर प्रदेशात सपा, राष्ट्रवादी, राजदची आघाडी; संजय राऊत म्हणतात, या आघाडीला पाठिंबा का द्यावा?

सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा

(10 thousand rupees will distribute from tomorrow for emergency relief flood affected people, says Vijay Wadettiwar)