Wardha accident | मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, मुलांना संस्कार देण्यात चुकतोय का?; डॉ. रंगारी यांना पडलेला प्रश्न

| Updated on: Jan 27, 2022 | 1:31 PM

कुणीतरी आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतोय ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती खूप महान आहे. लहापणापासूनच गोष्टींच्या स्वरूपात त्यांना हे सगळं शिकवायचा प्रयत्न करा. हे सगळं मनात उतरलं तर मुलं आपोआपच सुसंस्कृत होतील, असं डॉ. रंगारी यांचे मत आहे.

Wardha accident | मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, मुलांना संस्कार देण्यात चुकतोय का?; डॉ. रंगारी यांना पडलेला प्रश्न
अपघाताचे छायाचित्र
Follow us on

तेजस मोहतुरे

भंडारा : वर्धा शहराजवळ झालेल्या अपघातात मेडिकलचे सात विद्यार्थी ठार (Seven medical students killed) झाले. हा अपघात त्यांच्या पालकांसाठी तसेच देशासाठी झालेलं फार मोठं नुकसान आहे. सात डॉक्टरांचा मृत्यू झालाय. अपघाताची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. कुणी म्हणतो, त्यांनी ड्रिंक केलं होतं. कुणी सांगतंय की, जनावरे आडवी आली. त्यांना वाचविताना गाडी खाईत कोसळली. डॉ. नेपाल रंगारी (Dr. Nepal Rangari) म्हणतात, जे झालंय त्यावर चर्चा करून आता काहीच निष्पन्न होणार नाहीय. झालेले नुकसान भरून निघणार नाही. आईवडिलांना त्यांची बाळं परत मिळणार नाहीत. पण असे सगळे प्रसंग अंतर्मूख व्हायला लावतात. आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्यात कुठं चुकतोय का? हा विचार सतत मनात येतो. डॉ. रंगारी यांच्या मते, थोडं आठवून बघा. आपण कॉलेजमध्ये शिकत असताना कधी लेट नाईट पार्टी, आईबाबांच्या परवानगीशिवाय पिकनिकला जाणं, त्यांच्याशी खोटं बोलणं, ड्रिंकींग, ड्रग्स, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड या गोष्टी आपल्या मनात पण आल्या होत्या? पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना आपण त्यांच्यातल्या वाईट गोष्टींचंच उदात्तीकरण करत चाललोय, असं तुम्हाला नाही वाटतं. आजकाल तर मला खुपदा असं वाटतं की आपण आंधळेपणाने पाश्चात्य संस्कृती आपलीशी करतोय. ते अगदी डोळसपणे आपल्यातल्या चांगल्या गोष्टी शिकताहेत.

पाश्चिमात्यांचं अंधानुकरण नको

प्रत्येकच परदेशी लोकं वाईट आहेत असं नाही. त्यांच्याकडून त्यांचा शिस्तबध्दपणा, व्यवस्थितपणा, व्यक्तिस्वातंत्र्य हे सगळं शिकण्यासारखं आहे. मुळ म्हणजे पैशाचं महत्त्व मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. पैसे मूर्खपणाने खर्च करता कामा नये. ड्रिंक, ड्रग्स, सेक्सुअल फ्रिडमनं कॉलेज जीवन व्यापलंय. सामाजिक माध्यमांवरही याचं उदात्तीकरण होतंय. चित्रपट, वेबसिरीज, टीव्ही सिरीयल्स, कॉलेज लाईफवर असतं. यात अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टींवर जास्त फोकस असतं. मग मुलं त्याचंच अनुकरण करतात, असं डॉ. रंगारी यांचं म्हणणं आहे.

पैशाचं मूल्य मुलांना शिकवा

भीती नसल्यामुळे कितीतरी कोवळी मुलंमुली नको त्या गोष्टींच्या आहारी जाताहेत. व्यसनाधीन होताहेत. पालक यात बदल घडवून आणू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना पैशाचं महत्त्व समजावून सांगा. घरात कितीही सुबत्ता असली तरीही तो पैसा कमावण्यासाठी तुम्ही किती जीवापाड मेहनत घेतली आहे, त्याची जाणीव मुलांना कायम असायला हवी. आपल्या मराठीत एक म्हण आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे हे अगदी खरे आहे. तुमची लायकी नसताना जर जरुरीपेक्षा जास्त पैसा आणि सुबत्ता हातात आली तर मग आडमार्गाला जायला वेळ लागत नाही. जोपर्यंत मुलं आपल्याजवळ आहेत तोपर्यंत आपल्याला जमतील तेवढे चांगले संस्कार त्यांच्यावर करायचा प्रयत्न करा. मोठ्यांचा आदर करायला शिकवा. घरातले वादविवाद, भांडणं त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. कोणाही मोठ्या व्यक्तीबद्दल वाईटसाईट त्यांच्यासमोर बोलू नका. आपल्या आईवडिलांचा किंवा सासु-सासऱ्यांचा आपल्याला राग आला तरी आपल्या मनातच ठेवा. कारण ते त्यांचे आजी-आजोबा आहेत. देवावर विश्वास ठेवायला शिकवा. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना देवभोळं बनवा.

पालकांनो, मुलांना वेळ द्या

आजच्या काळात आपण सर्वजण बिझी आहोत. कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नसतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरी संस्कार द्यायला, गोष्टी सांगायला आजी आजोबा नसतात. पण, जोकाही वेळ तुम्हाला मिळतो तो मुलांसोबत घालवा. दिवसातला कमीतकमी एक तास तरी त्यांच्यासाठी ठेवा. त्यांच्या अभ्यासात, शाळेच्या अॅक्टिव्हीटीज, मित्र परिवार, सगळ्यात इंटरेस्ट घ्या. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. ती मुलं तुमच्या स्पर्शाची, थोड्या वेळाची भुकेली असतात. या अपघातासारखे प्रसंग कुठेतरी थांबायला हवं असं वाटलं. म्हणून हे लिखाण करण्याचा प्रयत्न केल्याचं डॉ. नेपाल रंगारी यांना सोशल मीडियावर टाकलंय.

Nagpur Police | नागपुरातून मोबाईल चोरीला, परत मिळण्याची शक्यता नव्हती; प्रजासत्ताकदिनी 17 जणांना गूडन्यूज!

Nagpur ZP | नागपूर झेडपी अध्यक्षांचा कार्यकाळ लवकरच संपणार; सोडतीबाबत उत्सुकता शिगेला

VIDEO : पत्नीचा गळा दाबला, सासूची झोपडी जाळली, मेव्हणीच्या लग्नात धिंगाणा, पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या ‘नाना’ करामती!