Ash pond bursts : कोराडी औष्णिक वीज केंद्राचा अॅश पाँड फुटला, नागपूरच्या काही गावात राखेच्या पाण्याची नदी

| Updated on: Jul 16, 2022 | 4:28 PM

सुपीक जमीन नापीक झाल्यानं परिसरातील गावकरी संतप्त आहेत. आता डबक्यात साचलेली राख वाहून जात आहे. त्यामुळं या भागात राखेची नदी झाली आहे.

Ash pond bursts : कोराडी औष्णिक वीज केंद्राचा अॅश पाँड फुटला, नागपूरच्या काही गावात राखेच्या पाण्याची नदी
नागपूरच्या काही गावात राखेच्या पाण्याची नदी
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा अॅश पाँड फुटला आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील राख या अॅश पाँडमध्ये जमा केली जाते. सततच्या पावसामुळं अॅश पाँड भरला. अॅश पाँड फुटल्यानं शेजारच्या खसाळा (Khasala), मसाळा (Masala), कवठा (Kavtha), खैरी गावात राखयुक्त पाणी वाहत आहे. यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालाय. वीज केंद्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय. कोराडी येथे औष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्रातून कोळसा जाळल्यानंतर उरणारी राख एका ठिकाणी साठवूण ठेवली जाते. या राखेच्या डबक्याला अॅश पाँड असं म्हणतात.

पाहा व्हिडीओ

राखयुक्त जमीन नापीक होणार

या अॅश पाँडमुळं आधीच या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न भीषण आहे. कारण ही अॅश श्वनाच्या माध्यमातून शरीरात जाते. यामुळं श्वसससाचे आजार वाढले आहेत. जमिनीवर ही अॅश हवेच्या माध्यमातून पोहचत असल्यानं जमीन बंजर झाली आहे. सुपीक जमीन नापीक झाल्यानं परिसरातील गावकरी संतप्त आहेत. आता डबक्यात साचलेली राख वाहून जात आहे. त्यामुळं या भागात राखेची नदी झाली आहे. ही राख ज्या ज्या भागात जाईल, ती जागा आणखी बंजर होईल. अशा राखयुक्त जागेवर कोणतीही पीक होत नाहीत. जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न या राखेमुळं या भागात निर्माण झालाय.

विहिरींचे पाणीसाठे दूषित

ही राख वाहून जात असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. या भागात एखादी विहीर खोदली तरी तिथं पाणी दूषित निघते. हे दूषित पाणी माणस तर सोडा जनावरसुद्धा पिऊ शकत नाही, अशी भीषण परिस्थिती आहे. जनावरांनी हे राखयुक्त दूषित पाणी पिल्यास त्यांच्या आजाराचं प्रमाण वाढतं. असं हे राखयुक्त पाणी या परिसराच्या लोकांच्या जीववर उठले आहे.

वीज केंद्राकडून युद्धस्तरावर काम सुरू

अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगत खसाळा राख बंधारा येथील पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. या बंधाऱ्यातून खसाळा, मसाळा, खैरी, कवठा गावांमध्ये नाल्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याचे कोराडी वीज केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तातडीने राख बंधारा स्थळी पोहचले. राख बंधाऱ्यातून दुपारी बारा वाजेपासून ओव्हरफलो पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा तातडीने देण्यात आला आहे. खसाळा राख बंधारा 341 हेकटर क्षेत्राचा असून सुमारे 7 किलोमीटर आतील जागेत राख साठवण करण्यात येते. 3.30 वाजताच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे.