शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

| Updated on: Sep 29, 2021 | 1:16 PM

गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा - विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि कापसाचं हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय, त्यामुळं सरकारनं 25 हजार रुपये हेक्टरी मदत करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी
चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते
Follow us on

नागपूर: गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने मराठवाडा – विदर्भात पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन आणि कापसाचं हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेलंय. त्यामुळे राज्य सरकारने तीन दिवसांत पीक नुकसानीचे पंचानामे करावे, जिथे पुरामुळे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे शक्य नाही, तिथे ड्रोनच्या मदतीनं पंचनामे करावे आणि सात दिवसांत हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

मागच्या दोन महिन्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी पुरामुळं जीवितहानी आणि वित्तहानी झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हेक्टरी 25 हजार द्यावी असल्याचं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना येत्या 7 दिवसात तातडीनं मदत द्यावी, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. आमची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळावी अशी आहे मात्र सरकारनं किमान 25 हजार रुपये शेतकऱ्यांना येत्या सात दिवसात द्यावेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

पूरस्थिती गंभीर, प्रशासनानं शेताच्या बांधावर यावं

पूर परिस्थिती ची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. मराठवाड्यात शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे , आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्या कडेला पाहणी करताये, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. त्यांनी ठरविले तर मराठवाड्याला न्याय मिळू शकेल, आणि अशी पाऊले ते उचलतील अशी मला अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्न धान्य द्यावे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

पंचनामा न करता मदत द्या

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली आहे. आता सरकार मधील मंत्री ही बोलले असून ओला दुष्काळ जर जाहीर झाला तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. आता तर सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले की पंचनामे न करता सरसकट मदत केली जाईल त्यामुळं राज्य सरकारनं मदत जाहीर करावी, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार यांचा
नेहमी केंद्राकडे बोट दाखवायचं असा ठरलेला कार्यक्रम दिसतो आहे, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. केंद्राकडं बोट दाखवण्यापेक्षा आम्ही मदत करू शकत नाही, असं सरकारने जाहीर करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले.

इतर बातम्या:

जयंत पाटलांचा कामाचा झपाटा, दिवसभर अतिवृष्टीची पाहणी, भेटीगाठी अन् रात्री साडे दहा वाजता जलसंपदा विभागाची बैठक

शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP leader Chandrashekhar Bawankule said Thackeray Government should gave relief fund to farmers within seven days