मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद वाढला, महाविकास आघाडी फुटणार?; विजय वडेट्टीवार यांनी बेधडक सांगितलं

| Updated on: May 28, 2023 | 11:14 AM

लोकशाहीच्या सर्वोच मंदिरावरून पेटलेला वाद म्हणजे लोकशाही मोडीत निघत असल्याचं द्योतक आहे. राष्ट्रपतींचा हक्क असताना 24 मोठ्या पक्षांनी विरोध केला असताना पंतप्रधानांनीच का उद्घाटन करावं?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

मोठा भाऊ-छोटा भाऊ वाद वाढला, महाविकास आघाडी फुटणार?; विजय वडेट्टीवार यांनी बेधडक सांगितलं
vijay wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी आमदारांची आकडेवारीही दाखवली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अजितदादांच्या म्हणण्याचं समर्थन केलं होतं. हा वाद सुरु असतानाच आता त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोठा भाऊ, छोटा भाऊवरून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट पडणार नाही. तो विषयच संपलेला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो आहे. महाविकास आघाडी आपली ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला निवडणुकीत वापरायची आहे. आपली संयुक्त ताकद आपण म्हणतो, तेव्हा काँग्रेस कमजोर आहे? राष्ट्रवादी कमजोर आहे? आणि शिवसेना कमजोर आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्याला पुढचा विचार करून मार्गक्रमण करावं लागणार आहे. आपण संयुक्तपणे लढण्याचा निर्णय जेव्हा घेतो, तेव्हा आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणणे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजितदादांना आवाहन

अजित पवार यांनी पुण्यातील जागेवर दावा केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा पुण्याच्या जागेवर दावा करत असेल तर त्यांनी सांगावं कसब्याची जागा आम्ही किती दिवसात जिंकली? त्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अजितदादांनी फारकत पडेल असं काही करू नये, ही त्यांना विनंती आहे, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.

मोदी लाटेत अनेक पराभूत

काँग्रेसकडे आहे त्या जागा राहू द्या. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला सोबत जायचं आहे. जिंकत आलो किंवा नाही हा प्रश्न नंतरचा आहे. सुरेश कलमाडींपासून आम्ही ती जागा जिंकत आलो आहोत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर ती जागा हरलो. मोदी लाटेमध्ये अनेक दिग्गज हरले होते. त्यामुळे याचा निकष लावू नका, असंही ते म्हणाले.

आघाडी धर्म पाळा

बापट लढत असलेल्या मतदार संघातील जागा काँग्रेस जिंकू शकली नाही असे अजितदादा म्हणतअसेल तर कसब्याची जागा ही काँग्रेसने 38 वर्षानंतर जिंकली आहे. आता महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे. यामध्ये सगळ्यांना समजदारीची भूमिका घेतली पाहिजे. आघाडी टिकावी यासाठी एकत्रपणे लढले पाहिजे. अनेक ठिकाणी 2014 मध्ये अनेकांचा पराभव झाला.

मोठे मोठे दिग्गजही पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्याची तुलना करण्यापेक्षा उदाहरण म्हणून कसबा किती वर्षांनी जिंकलेली, त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली असा म्हणायचं नाही का? पण महाविकास आघाडी म्हणून लढायचा असेल तर आघाडी धर्म म्हणून पाळला पाहिजे. त्या जागेवर वाद घालण्यापेक्षा ती काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसकडे राहावी, असं ते म्हणाले.