Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे हिंदूविरोधी, मंदिर महासंघ का झाला आक्रमक? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, प्रकरण तरी काय?
Complaint Against Tukaram Mundhe: राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. आता त्यांनी गणेशोत्सवासह सर्व धार्मिक सणातील भंडारे, महाप्रसादांकडे मोर्चा वळवला आहे. त्यावरून वाद उफळला आहे.

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात जोरदार मोहिम उघडली आहे. दूधपासून ते बड्या ब्रँडपर्यंत सर्वांचे धाबे दणाणले आहे. भेसळखोरांना त्यांनी पळता भूई थोडी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दणकेबाज कारवाई सुरू असून त्याला जनप्रतिसाद मिळाला आहे. मुंढे आणि त्यांचा विभाग आक्रमक कारवायांमुळे राज्यातच नाही तर देशात चर्चेला आला आहे. आता त्यांनी गणेशोत्सवासह सर्व धार्मिक सणातील भंडारे, महाप्रसादांकडे मोर्चा वळवला आहे. त्यावरून वाद उफळला आहे.
तुकाराम मुंढे हिंदूविरोधी
भेसळखोरांविरोधात मोहिम उघडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात कडक नियमावली जाहीर केली आहे. मंदिर, मंडळांकडून करण्यात येणाऱ्या भंडारा, अन्नदान आणि महाप्रसादाबाबत त्यांनी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमामुळे मुंढे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मुंढे हे हिंदूविरोधी असून पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप नागपूरमधील महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केला आहे. सेवाभावी उपक्रमांवर व्यावसायिकांप्रमाणे नियमावली लादू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी या नियमावली आणि तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनामार्फत ही तक्रार केली आहे. मुंढे हे केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवर आणि मंदिरांमधील प्रसादावर कडक नियम लादत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून आणि सेवाभावाने महाप्रसाद शिजवला जातो. हॉटेल आणि व्यावसायिक खाद्यविक्री प्रमाणे या सेवाभावी उपक्रमांवर कोणतेही कडक निर्बंध लादू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. अन्नसुरक्षेबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणताही आक्षेप नाही. पण कायदा हा सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांना समान पद्धतीने लागू करण्यात यावा. इतर धर्मीयांच्या सणांमधील सार्वजनिक अन्नवितरणाला हे नियम का लागू केले जात नाहीत, असा सवाल विश्वस्तांनी केला आहे. त्यांनी FDA हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केली आहे.