लोकप्रतिनिधींचा काजू, बादामावर ताव, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रशासनाने अशा…

ज्या ठिकाणी पाणी आहे, तिथे रब्बीचं नियोजन करणार आहोत. काही भाग प्रचंड ड्राय आहे. मोठ्या धरणात सुदैवाने पाणी आहे. पण मराठवाड्यातील छोट्या धरणात पाणी कमी आहे. मोठ्या धरणातील पाणी राखून ठेवलं आहे. पुढचा अंदाज येईल, तेव्हाच त्याबाबतचा निर्णय घेऊ. पण तूर्तास पाणी राखून ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

लोकप्रतिनिधींचा काजू, बादामावर ताव, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रशासनाने अशा...
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 1:08 PM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधी काजू, बादामवर ताव मारताना दिसले. त्याचा व्हिडीओही व्हायरल जाला आहे. यावरून राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असताना त्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले. प्रशासनाने अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. अशा गोष्टी करणं योग्य नाही, असं सांगतानाच दुष्काळ म्हणून कोणी अशा गोष्टी करत नाहीत, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. एखादी बैठक असेल तर साधारणपणे प्रशासनाकडून काजू, बादाम दिले जातात. आपल्याकडे तशी पद्धत आहे. पण प्रशासनाने काही ठिकाणी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. कोणीही या गोष्टी जाणीवपूर्वक करत नाहीत. दुष्काळ म्हणून कोणी असं करत नाही. पण तरीही प्रशासनाने अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील सर्व पालकमंत्री आज शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा खंड पडल्याने मोठ्या प्रमाणात पीकं खराब होत आहेत. या गोष्टींचा आम्ही आढावा घेत आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी त्यावर नीट चर्चा केली. प्रत्येक मंत्र्यांना आपआपल्या जिल्ह्यात जायला सांगितलं. त्यानुसार ते जिल्ह्यांमंध्ये गेले आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढच्या आठवड्याभरात प्राथमिक आढावा घेऊ. त्यानंतर पंचनामे करू आणि शेतकऱ्यांना भरपाई देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

जास्तीची वीज देऊ

कर्जमाफीच्या तीन याद्या झाल्या आहेत. ऊर्वरीत याद्या तयार करू. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. तातडीची मदत केली जाईल. पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था केली आहे. अल निनोचं संकट माहीत असल्याने वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला होता. चाऱ्याची लागवड केली आहे. जिथे गरज असेल तिथे चारा देऊ. जास्तीची वीजही शेतकऱ्यांना देणार आहोत. सिंगल फेसिंगमुळे वीज देत नव्हतो, तिथेही वीज देणार आहोत. जिथे विहिरीला पाणी आहे, तिथेही पीकं जगवण्यासाठी जास्तीची वीज देऊ. संध्याकाळचीही वीज देऊ. शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असं फडणवीस यांनी सांगितलं.

विरोधकांना वाईट सवय

दुष्काळाचे काही नियम आहेत. दुष्काळाबाबतचे जीआर आहेत. ते विरोधकांनाही माहीत आहेत. त्यांच्या काळातही ते जीआर होतेच. दुष्काळात कधी काय करायचे त्याचे हे नियम आहेत. त्याचं पालन केलं तरच एनडीआरएफचे पैसे मिळतात. आपण नियमाचं पालन करणार आहोत. पण त्यापूर्वीच आपण शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. पण विरोधकांना राजकारण करण्याची वाईट सवय सुरू आहे. त्याला काही करू शकत नाही, असं ते म्हणाले.

वाट न पाहता मदत

केंद्राकडे दुष्काळासाठी पैसे मागण्याची पद्धत आहे. म्हणूनच 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आपण पंचनामे करून केंद्राला अहवाल देणार आहोत. पण केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपण भरपाई देणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us