सर्वात मोठी बातमी ! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?; अनिल देशमुख यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

| Updated on: Jun 01, 2023 | 12:22 PM

राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या शिबीरासाठी शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळांसह अनेक नेते नागपुरात येत आहेत. शरद पवार 3 तारखेला नागपूरला आल्यानंतर बाळू धानोरकर, मोरेश्वर टेमुर्डे यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी वरोरा येथे जाणार आहेत.

सर्वात मोठी बातमी ! पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?; अनिल देशमुख यांच्या त्या विधानाने चर्चांना उधाण
pankaja munde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मी भाजपात आहे. भाजप थोडीच माझा आहे, असं विधान करून खळबळ उडवून दिली आहे. पंकजा यांच्या या विधानामुळे त्या पक्षात नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या मनात वेगळा विचार तर नाही ना? अशीही चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत येणार का? असा सवाल केला जात आहे. अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

पंकजा मुंडे काय बोलल्या तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे. पंकजा यांनी जर राष्ट्रवादीत येण्याचा विचार केला तर त्यावर विचार केला जाईल. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याबाबत निर्णय घेतील. प्रस्ताव असेल तर बीडमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पण तशा पद्धतीचं माझ्याकानावर काही आलं नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांच्या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

कोल्हे राष्ट्रवादीतच

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्टरबाजी सुरू केली आहे. त्यावर भावी खासदार असं लिहिलं आहे. त्यामुळे शिरूरमधून अमोल कोल्हे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरही अनिल देशमुख यांनी भाष्य केलं. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार आहेत, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

मतभेद नाहीत

राष्ट्रवादीकडून लोकसभा मतदारसंघातील चाचपणी सुरु आहे. मतदारसंघ बदलासाठी चाचपणी झाल्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील. राष्ट्रवादी जशी चाचपणी करतेय, तशीच चाचपणी काँग्रेस, ठाकरे गट करतोय. त्यानंतर एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार आहे. हेच ठरलंय. आम्ही एकत्र निवडणुक लढणार. मतभेद नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

वरिष्ठांचा निर्णय वरिष्ठ घेतील

वरिष्ठ नेत्यांना लोकसभेत जायचं की नाही याबाबत वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील. विदर्भात काँग्रेस जास्त जागा लढवते. पण अजून काही जागा राष्ट्रवादी मागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे.नागपूर शहरात विधानसभेची जागा मिळावी यासाठी आम्ही काँग्रेस, शिवसेनेबत चर्चा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

कापसाची होळी करू

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची वाईट स्थिती आहे. शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेनं कापूस साठवून ठेवला. पण आता दर पडलेत म्हणून शेतकरी संकटात. केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावं. राज्य सरकारने कापूस शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. आयात-निर्यात धोरण बदलणे गरजेचं आहे. परदेशातून कापूस आयात केल्यामुळे कापसाचे दर पडले आहेत. चार पाच दिवसांत केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. तर शेतकरी कापसाची होळी करायला मागे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.