काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

| Updated on: Mar 25, 2023 | 9:42 AM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने देशभरात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला असतानाच देशमुख यांनी हे विधान केलं आहे.

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर
Rahul Gandhi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर एकीकडे काँग्रेसने आरपारची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्येच काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असं चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी थेट राहुल गांधी यांनाच ओबीसींची माफी मागण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी नाही मागितली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील, असा इशाराच आशिष देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आशिष देशमुख यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून साडेतीन हजार किलोमीटर पायी चालले. साडेचार महिने ही यात्रा चालली. भारतजोडोच्या माध्यमातून चांगला संदेश दिला. राहुल गांधी आज लोकप्रियतेच्या उच्चतम शिखरावर आहेत. पण असताना त्यांनी चार वर्षांपूर्वी काही चुकीचं विधान गेलं होतं. त्यातून ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील ओबीसींची माफी मागावी, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आधीही माफी मागितली होती

राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर किंवा राफेलच्या विधानावरून काँग्रेसचे नेते नाराज होते. तेव्हा कोर्टात त्यांनी माफी मागितली होती. आता इथे प्रश्न एका व्यक्तीचा नाही. जर राहुल गांधी यांच्या विधानाने ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, ओबीसींच्या मनाला ठेच पोहोचली असेल तर राहुल गांधी यांनी माफी मागायला हवी. हा माझ्याकडून घरचा आहेर नाही. ही एका समाजाची बाब आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

तर ओबीसी दुरावेल

येणाऱ्या काळात कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे ओबीसी समाज भाजपकडे जाऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी माफी मागावी. माफी मागितली तर ओबीसी समाज काँग्रेसमागे येईल. नाही तर हा समाज भाजपच्या मागे जाईल. राहुल गांधी यांनी चुकून जरी म्हटलं असलं तरी त्यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांची माफी मागण्यात गैर काय? असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

देशमुखांकडून कोंडी

दरम्यान, एकीकडे खासदारकी रद्द करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयावरून देशभर आंदोलन करून भाजपला घेरण्याचा काँग्रेसने प्रयत्न सुरू केलेला आहे. तर दुसरीकडे आशिष देशमुख यांनी राहुल गांधी यांना थेट घरचा आहेर देऊन काँग्रेसची कोंडी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अजूनही एकवाक्यता नसल्याचं उघड झालं आहे.