मोठी बातमी ! नवनीत राणा यांना तिकीट मिळणार नाही?, कुणी केला दावा?; अमरावतीत काय चाललंय?
महायुतीचं अजून जागा वाटप झालेलं नाही. कोणत्या पक्षाला किती जागा देणार याचं सूत्रही ठरलेलं नाही. पण त्या आधीच महायुतीत ठिणग्या उडायला लागल्या आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना तिकीट देण्यास विरोध केला आहे. अमरावतीचा खासदार बदलला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे राणा यांची कोंडी झाली आहे.
स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अमरावती | 14 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी एक मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं टेन्शन वाढवलं आहे. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही, असा दावा अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. महायुतीतीलच नेत्याने हे विधान केल्यामुळे राणा दाम्पत्यांचं टेन्शन वाढलं आहे. आधीच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जागेवर दावा केला आहे. आता अडसूळ यांनी धक्कादायक विधान केल्याने राणा दाम्पत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
अमरावती येथे महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना आणि मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना अभिजीत अडसूळ यांनी थेट राणा दाम्पत्यांनाच अडचणीत आणणारं विधान केलं आहे. आज महायुतीचा मेळावा पार पडला. सर्व पक्षाच्या नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वातावरणही राणा दाम्पत्यांविरोधात आहे. निवडणूक सर्व्हेही त्यांच्या विरोधात आहे. जोपर्यंत उमेदवार बदल होत नाही तोपर्यंत भाजपचा आकडा वाढणार नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे. त्यासाठी आकडा वाढवायचा असेल तर नवनीत राणा यांना तिकीट देऊन चालणार नाही. उमेदवारी बदलली जावी. शिवसेनेला उमेदवारी द्यावी. या आधी पाच टर्म शिवसेनेचे खासदार होते. आनंदराव अडसूळ दहा वर्ष खासदार होते. त्यामुळे शिवसेनेलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, असं अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं आहे.
सीट धोक्यात आहे
अमरावतीमधील ही सीट धोक्यामध्ये आहे. भारतीय जनता पक्षाला सुद्धा याची माहिती आहे. महायुतीच्या मेळाव्यात प्रत्येकाने नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाच्या मनाला लागलेल्या वेदना आहेत. त्या व्यक्त झाल्या आहेत. या वेदना सहजासहजी मिटणार नाहीत. त्यामुळेच नवनीत राणांना वरिष्ठ नेतृत्व तिकीट देईल असं मला वाटत नाही, असं मोठं विधान अडसूळ यांनी केलं.
पक्षच ठरवेल
तुम्ही लोकसभेला उभे राहणार की आनंदराव अडसूळ? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी निवडणूक लढवावी की आनंदराव अडसूळ यांनी निवडणूक लढवावी हे पक्ष ठरवेल. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्यासाठी आम्ही काम करू. पण अमरावतीचा खासदार बदलला पाहिजे. खासदार बदलण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून ते आले नाहीत
बडनेरामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. उलट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढले आहेत. त्या ठिकाणी चरस, गांजा खुलेआम विकल्या जातो. मला वाटतं की, त्या ठिकाणचे आमदार याला कारणीभूत आहेत, असा आरोप करतानाच बच्चू कडू आणि त्यांचे आमदार राजकुमार पटेल यांच्या विरोधात राणा नवरा-बायकोने काही दिवसांपूर्वी विधाने केली होती. त्यामुळेच राणा यांना कंटाळून बच्चू कडू आणि राजकुमार पटेल आजच्या मेळाव्याला आले नाहीत, असं ते म्हणाले.