कृषी पंपांची वीज तोडणी थांबवा, किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

| Updated on: Nov 26, 2021 | 3:58 PM

कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे. कारण रात्री मिळणारी वीज रात्री 11 वाजताऐवजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कृषी पंपांची वीज तोडणी थांबवा, किशोर तिवारी यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना किशोर तिवारी.
Follow us on

नागपूर : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान या पिकांचे नुकसान झालंय. असं असताना वीज वितरणनं कृषी पंपांची वीज तोडणीचा सपाटा लावलाय. यावर आळा बसावा, यासाठी कृषीपंपांची वीज तोडणी थांबवा, अशी विनंती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

चालू खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः बुडाला. आता शेतकऱ्यांची सर्वस्वी मदार रब्बी पिकांवर आहे. वीज वितरण कपंनीनं वीज तोडणी केल्यामुळं शेतकऱ्यांच्या कामात बाधा येत आहे. शेतकऱ्यांशी सहकार्यानं वागावे व कृषीपंपाची वीज तोडणी त्वरित थांबावी, अशी विनंती अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळं आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली आहे.

थकबाकीसाठी सक्ती नको

सनदी अधिकारी मंत्रालयात आपल्या वातानुकूल चेंबरमध्ये बसून सक्तीच्या वसुलीसाठी रोज नवीन-नवीन आदेश काढतात. वीज कंपनीचे अधिकारी एकीकडे वीज तोडणी वा रोहित्रे-ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी 100 टक्के थकबाकीचा भरणा करा, अशी सक्ती करतात. मात्र अशी सक्ती नापिकीग्रस्त वा दुष्काळग्रस्त भागात करता येत नाही. वीज वितरण कंपनीचे अभियंता सरळ ऊर्जामंत्र्यांशी बोला, असा सल्ला देत आहेत.

वीज रात्रीऐवजी दिवसा पुरवावी

कृषी पंपाना देण्यात येणारी विजेची वेळ ही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. ही वेळही बदलून देण्याची मागणी होत आहे. कारण रात्री मिळणारी वीज रात्री 11 वाजताऐवजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रोहित्रे व इतर दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले.

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही

MLC ELECTION नागपूर आणि अकोला थेट लढत होणार, नागपुरात बावनकुळे, भोयर यांच्यात सामना