सत्ता बनवायला 175 लागतात, पण, राष्ट्रवादीकडं 45, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले

राष्ट्रवादीवाले सत्ता गेल्यापासून पिसाळले आहेत.

सत्ता बनवायला 175 लागतात, पण, राष्ट्रवादीकडं 45, चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावले
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Oct 27, 2022 | 2:47 PM

नागपूर : प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला वाटतं बच्चू कडू आणि रवी राणा दोघेही आपापल्या मतदारसंघात प्रभावी नेते आहेत. आपापल्या कामावर ते निवडून येतात. मला वाटतं दोघांमध्ये वाद वाढवण्यासाठी काहीतरी ठिणगी टाकण्याचा काम झालं आहे. या ठिणगीने गैरसमज वाढत गेले आणि वाद वाढलाय, असं मत बावनकुळे यांनी व्यक्त केलंय.

यामध्ये कोणीतरी मध्यस्थी करावी लागेल. दोन भावात जरी वाद झाले तरी कोणीतरी मध्यस्थी करतो. म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यामध्ये मध्यस्थी करतील. त्यांचे गैरसमज दूर होतील, असं मला वाटतं. बच्चू कडू यांच्यासोबत कुठले सात-आठ आमदार आहेत. ते कशाकरता आहेत हे बच्चू कडू यांनाच विचारावं लागेल, असंही बावनकुळे म्हणाले.

सुरज चव्हाण यांच्यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राष्ट्रवादीवाले सत्ता गेल्यापासून पिसाळले आहेत. त्यांना सत्तेमध्ये राहण्याची सवय आहे. त्यांना विरोधात राहायची सवय नाही. पिसाळलेल्या प्रवृत्तीमध्ये त्यांचे अध्यक्ष, नेते, प्रवक्ते काय काय बोलत राहतात. ते आता मुख्यमंत्री बनवायलासुद्धा निघाले आहेत. मुख्यमंत्री बनवायला 175 लागतात. पण 45 च्या वर राष्ट्रवादी कधीच गेली नाही.  त्यांच्या आयुष्यात राष्ट्रवादी कधी बहुमतात आली नाही.

जो पक्ष देशात सगळ्यात मोठा आहे, त्या पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे नेते आहे. ते मुख्यमंत्री सुद्धा राहून चुकलेले आहेत. ते दुसऱ्याच्या कामावर कधी अतिक्रमण करत नाहीत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे दोघेही इव्हेंट मॅनेजमेंट करतात. त्यामध्ये ते वस्ताद आहेत. थोडा वेळ पाहणी करतील. टीव टीव करतील. सोबत आपली पेग्विन सेना घेऊन फिरत आहे. केवळ हा इव्हेंट आहे. सत्ता होती तेव्हा कामं केली नाही, असा टोलाही त्यांनी ठाकरे व सुळे यांच्यावर लगावला.

काल त्यांच्या प्रवक्त्या म्हणाल्या, सत्तेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करण्यापेक्षा दौरा केला असता तर बरं झालं असतं. असा आता त्यांचेच लोकं बोलतात. सत्तेच्या निराशेचे हे वादळ तयार झालेला आहे. त्यांना समाजामध्ये काम करण्याची सवय नाही. सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आले आहेत.

नशिबाने मंत्री आणि मुख्यमंत्री पद मिळाले. त्यावेळी त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे होता. तो त्यांनी घेतला नाही. आता टीव टीव करतात. असं मत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us