नांदेडः 9 वर्षांपूर्वी घरातून रागावून गेलेला मुलगा एका चहावाल्याने तयार केलेल्या व्हॉट्सअप पोस्टमुळे पुन्हा एकदा कुटुंबाला परत मिळाला. नांदेडमधील अरविंद गायकवाड हा मुलगा रागावून घरातून निघून गेला होता तेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता. घरातून बाहेर पडल्यावर ते भरकटला. त्याला फक्त आपल्या गावाचे नाव आठवत होते. अरविंद पुण्यात पोहोचल्यावर एका चहावाल्याने त्याची कहाणी ऐकली अन् त्याची कुटुंबियांशी भेट घालून द्यायची ठरवले. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि आज अरविंद त्याच्या कुटुंबात परत आला.
21 वर्षीय अरविंद गायकवाड हा 12 वर्ष वयाचा असताना अरविंद रागाच्या भरात घरातून निघून गेला. पहिले परभणी आणि नंतर तो थेट पुण्यात पोहोचला. मिळेल ते काम करून फुटपाथ वर झोपून तो दिवस काढू लागला. इकडे आई वडिलांनी अरविंद चा शोध घेतला पण अरविंद सापडला नाही. पाहता पाहता 9 वर्ष उलटून गेली. अरविंदला आपल्या तालुक्याचे आणि नांदेडचे नाव आठवत होते. अरविंद हडपसर येथील एका चहा टपरीवर नियमितपने चहा प्यायला जायचा. या चहावाल्याने अरविंदची कहाणी ऐकून त्याचा फोटो आणि एक पोस्ट व्हाट्सएपवर शेयर केली. ही पोस्ट मनूला गावातील एका ग्रुप पर्यंत पोहोचली. अरविंदच्या भावाने त्याला ओळखले.
अरविंदच्या घरातील परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे ग्रामस्थानी पुढाकार घेतला आणि ते थेट पुण्यात पोहोचले. अरविंद त्यांना तिथे भेटला आणि त्याला गावी घेऊन परत आले. अरविंद परतल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ आनंदात आहेत. चहा टपरी चालकाने अरविंदची कहाणी सोशल मीडियावर शेयर केली आणि 9 वर्षांपासून कुटुंबापासून दुरावलेला मुलगा त्यांना परत मिळाला. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास त्यातून कुणाचं तरी भल होऊ शकते हे या घटनेवरून सिद्ध झालंय.
इतर बातम्या-