धडधाकट असून नैराश्य येतंय? ही घ्या प्रेरणा… घोर अंधःकारातून शोधली प्रकाशाची वाट, Nandurbar मध्ये अंध युवकांचा अॅक्युप्रेशर अन् मसाजद्वारे उदरनिर्वाह
जगण्यातील सकारात्मकतेवर विश्वास ठेवला. नकारात्मकतेला स्पर्शही न करू दिला नाही. अपयशालाही लाज वाटेल एवढे प्रयत्न केले अन् आपली वाट शोधली. धडधाकट, सुखी संपन्न असूनही निराशाजनक विचार करणाऱ्यांनी यातून प्रेरणा घ्यायलाच हवी.
नंदुरबारः धडधाकट असून अनेकदा नैराश्याच्या (Depression) आहारी गेलेले असंख्य युवक आपल्या आजूबाजूला दिसतात. पण ज्यांना प्रेरणा (Inspiration) मिळण्याएवढी, आशेचा किरण दिसण्याएवढीही दृष्टी नसते, त्यांचं काय? तिथं स्वयंस्फूर्ती, अंतर्मनातील जगण्याची तीव्र इच्छा, प्रतिकुलतेवर मात करण्याची जिद्द कामी येते आणि घडतात स्वप्निल वासवे, सागर इंगळेसारखे प्रेरणादायी युवक. सागर हा नंदुरबारमधला (Nandurbar) जन्मतः अंध युवक. जगण्याच्या एका अनामिक ओढीनं त्यानं बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आई-वडिलांनी इथपर्यंत शिकवलं, आता त्यांच्यावर अवलंबून रहायचं नाही, स्वतः पैसे कमवायचे, असं मनाशी पक्क केलं आणि स्वतः काम करून घरच्यांना पैसे पाठवून स्वतःसोबत घरच्यांच्या देखील विचार करत आहे. सागरनं अॅक्युप्रेशन अन् मसाजचं तंत्र शिकून उदरनिर्वाहाला सुरुवात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजगाव डॉग मार्फत निधी देऊन स्वाधार कौशल्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात अनेक अंध अपंग युवकांनी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबनाची वाट धरली आहे.
केंद्रातून 22 युवकांची रोजीरोटी सुरु
जीवन जगण्याचा धडा देणारे अनेक लोक असतात. मात्र या अंध युवकांकडून बघून जगणं काय असतं शिकता येईल. नंदुरबारमधील या केंद्रातील स्वाधार संस्था गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारे दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देत आहे. आतापर्यंत 35 युवकांनी इथं प्रशिक्षण घेतलं असून 22 तरुणांना या प्रशिक्षणातून रोजीरोटीचा मार्ग उमगला आहे. आता ते कुणावरही अवलंबून न राहता पोटापाण्यासाठी पैसे कमावत आहेत.
शिक्षणाचं चीज केलं…
शिक्षण वाघिणीचं दूध असतं. मात्र या अंध मुलांनी शिक्षण घेऊन करावं तरी काय.. असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. आई वडिलांनी पोट तिडिकीने शिक्षण दिल्यानंतर त्याचं खरं चीज करून दाखवण्याची हिंमत या या तरुणांनी बाळगली. जगण्यातील सकारात्मकतेवर विश्वास ठेवला. नकारात्मकतेला स्पर्शही न करू दिला नाही. अपयशालाही लाज वाटेल एवढे प्रयत्न केले अन् आपली वाट शोधली. धडधाकट, सुखी संपन्न असूनही निराशाजनक विचार करणाऱ्यांनी यातून प्रेरणा घ्यायलाच हवी.