महायुतीचं सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत देणार? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
"रशिया आणि युक्रेनचं युद्ध अखाती देशाचे युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले. आपल्या इकडे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव कमी झाले आहेत. या ठिकाणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली. त्यांचा आशीर्वाद घेतला, चर्चा केली आणि आमच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजित दादांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये भाषण करताना शेतकऱ्यांबाबत एक गुडन्यूज दिली. खान्देशात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पण यावर्षी कापसाला हवा तसा भाव मिळालेला नाही. याची जाणीव सरकारलादेखील आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. “यावर्षी आपल्याला कल्पना आहे. जगामध्ये युद्ध सुरू झालं. रशिया आणि युक्रेनचं युद्ध अखाती देशाचे युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले. आपल्या इकडे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव कमी झाले आहेत. या ठिकाणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली. त्यांचा आशीर्वाद घेतला, चर्चा केली आणि आमच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजित दादांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आमचे सगळे मंत्री सोबत होते की, आपल्याला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि म्हणून भाव कमी झाले असले तरी भावांतर योजना लागू करू. 4000 कोटी रुपये कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील. मोदी सरकार कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी यांच्या पाठीशी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘केंद्राकडून महाराष्ट्रात सिंचनासाठी 26000 कोटी रुपये’
“आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला 26000 कोटी रुपये सिंचनाकरता मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
“मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. जगातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणायचे, जगातले पाच देश पुढच्या दोन वर्षात दिवाळखोर होतील. पण त्या पाच देशांमध्ये ते भारताचे नाव सांगायचे. ते सांगायचे 2014-15 पर्यंत भारत दिवाळखोर होणार. पण दहा वर्षात मोदीजींनी अशी जादू केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडांनी सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला न्यायची आहे”, असं फडणवीस म्हणाले.