Narsapur case : बशर अली प्रकरणातही असंच घडलं, न्यायाधीशांनी दिला दाखला; नरसापूर प्रकरणाचा फैसला थोड्याच वेळात
पुण्यातील नसरापूर हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले असून, फाशी की जन्मठेप याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी बशर अली प्रकरणाचा दाखला दिला. अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो अंतर्गत क्रूर गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी भीमराव कांबळेला कठोर शिक्षेची शक्यता आहे. न्यायालयाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या नसरापूर हत्याकांडाचा निकाल थोड्याच वेळात येणार आहे. पुण्याच्या शिवाजी नगर न्यायालयाकडून हा निकाल दिला जाणार आहे. आरोपीला या पूर्वीच कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तसेच त्याला दोषी ठरवताना तुला कोणती शिक्षा हवी? फाशी की जन्मठेप? तूच सांग. 1 मे रोजी केलेलं कृत्य तू आठव, असं कोर्ट म्हणालं होतं. त्यानंतर आज कोर्ट आरोपी भीमराव कांबळेला काय शिक्षा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आरोपी भीमराव कांबळेला कोर्टात आणण्यात आलं आहे. तसेच कोर्टात दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जात आहेत. एस आर साळुंखे यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायाधीशांनी काही राज्यात घडलेल्या केसचा दाखला दिला. तसेच बशर अली केसमध्येही असंच घडलं होतं, असं न्यायाधीशांनी सांगितलं. काही घटना वाचून दाखवल्यानंतर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती, असंही न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
मोठा बंदोबस्त
आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो अंतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे. आरोपीचा गुन्हा अत्यंत क्रूर असल्याचं कोर्टान म्हटलं आहे. कोर्टाबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
1 मे रोजी भीमराव कांबळेने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. ही मुलगी आजीकडे आली होती. एकटीच होती. भीमराव कांबळेने या मुलीवर पाळत ठेवून तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या मुलीची हत्या करण्यात आली होती. ही घटना उघड झाल्यावर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी राज्यभरात निदर्शने झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा वेगाने तपास करून भीमराव कांबळेला अटक केली. त्याच्यावर अवघ्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल केले होते. 1 हजार 200 पानांचं हे दोषारोपपत्र होतं.
पोलिसांनी मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्ष साक्षीदार, पंच, न्यायवैधक अधिकाऱ्यांचा अहवाल आणि घटनास्थळी मिळालेले पुरावे या आधारे दोषारोपपत्र तयार केले होते. या प्रकरणात 50 हून अधिक लोकांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले होते.
या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाली तेव्हा सरकारी वकिलांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. प्रत्येक घटनाक्रम कोर्टाच्या नजरेत आणून दिला होता. तसेच सर्व पुरावेही कोर्टाच्या समोर मांडले होते. आरोपीला फाशी देण्यासाठी जुन्या केसेसचे संदर्भही दिले होते.