नारायण राणे यांचं दुर्दैव, अशी रिकाम टेकडे पोरं… ठाकरे गटाच्या नेत्याची झोंबरी टीका

| Updated on: May 27, 2023 | 6:02 PM

गजानन कीर्तिकरांना मी आधीच म्हटले होते की तुम्ही शिंदे गटाकडे कशासाठी गेलात? त्यांना आता कळले की आपले काही खरे नाही. कारण आपला मुलगा आपल्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांचं दुर्दैव, अशी रिकाम टेकडे पोरं... ठाकरे गटाच्या नेत्याची झोंबरी टीका
RANE FAMILY
Follow us on

सागर सुरवसे, औरंगाबाद : शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत दररोज प्रसार माध्यमांवर येऊन केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आमदार नितेश राणे पुढे सरसावले आहेत. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नितेश राणे ही पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, याच नितेश राणे यांच्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्याने झोंबणारी टीका केलीय. त्यातच शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या नाराजीवरही या नेत्याने मोठे भाष्य केलंय.

शिवसेनेतील 13 बंडखोर खासदार जाऊन शिंदे गटाला मिळालेले आहेत त्यामुळे आता 22 चा प्रश्नच येत नाही. आत्तापासूनच शिंदे गट आणि भाजपमध्ये तू तू मै मै सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप यांना किती जागा देतील हे भाजप ठरवेल. तिकडे गेलेले कोणीच निवडून येणार नाहीत असा भाजपचाच सर्वे सांगत आहे. निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाचे सर्व साफ होणार आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाला जास्त जागा कशाला सोडतील असा सवाल ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

कीर्तिकर अगदी योग्य ट्रॅकवर आले आहेत

भाजप आणि शिंदे गटात आता आपापसात भांडण सुरू झाले आहे. त्यामुळे गजानन कीर्तीकर यांनी जे सांगितले ते योग्यच सांगितले. गजानन कीर्तिकर हे अगदी योग्य ट्रॅकवर आलेले आहेत. त्यांना आता कळले की आपण तिकडे जाऊन चूक केली. गजानन कीर्तिकरांना मी आधीच म्हटले होते की तुम्ही शिंदे गटाकडे कशासाठी गेलात? त्यांना आता कळले की आपले काही खरे नाही. कारण आपला मुलगा आपल्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.

काही अतिउत्साही असतात ते

विधानसभा अध्यक्षांनी आता काहीही निकाल दिला तरी ते प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा चेहरा पडलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अदिती तटकरे, सुनील प्रभू, सुनील राऊत यांना लोकसभेची तिकीट देण्याची शक्यता आहे. पण, वास्तविक पाहता अद्याप एका नावाचीही चर्चा झालेली नाही. काही अतिउत्साही असतात ते अशी नावे देऊन टाकतात, असा टोला त्यांनी लगावला.

शिंदे गट, मिंधे गट कोणीही निवडून येऊ शकत नाही

संभाजीनगरची ही जागा शिवसेनेचा गड आहे. शिवसेनेने सहा ते सात वेळा ही जागा जिंकली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिंदे गट, मिंधे गट कोणीही येथे निवडून येऊ शकत नाही. येथील लोकांना आता इम्तियाज जलील याला मतदान केले याचा पश्चाताप होत आहे. काही लोकांनी अपक्षला मतदान केले म्हणून हा चुकून निवडून आला. इम्तियाज जलील याने कोणाचेही काम केले नाही. ग्रामीण भागात गेला नाही. लोकांची सेवा केली नाही. त्यामुळे लोकांना कळायला लागले की आपण चूक केली म्हणून हा गड शिवसेनेचाच राहील असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला.

रिकाम टेकडे पोरं जन्माला आले

नारायण राणे याचा मुलगा नितेश राणे या पोराला अक्कल आहे का? काहीही बोलतोय. आम्ही असे म्हणतो की नारायण राणे यांचे दुर्दैव की असे रिकाम टेकडे पोरं जन्माला आले अशा शब्दात खैरे यांनी झोंबरी टीका केली.