
मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी धाड टाकत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. मंत्री झिरवाळ यांच्या विभागाचे क्लार्क राजेंद्र ढेरेंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आल्यानंतर चौकशी दरम्यान ढेरंगे यांनी झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून आपण पैसे स्वीकारले असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे झिरवाळ यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यानंतर आता नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. एसीबीने त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक मध्ये आयोजित आदिवासी संमेलनाच्या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. आयोजकांनी देखील झिरवाळ यांच्याशी आमचा संपर्क होत नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ नेमके कुठे आहेत हा प्रश्न उपस्थित होते आहे.
या प्रकरणावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांच्या विभागात झालेल्या कारवाईबाबत पोलिस चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल. त्यांनी स्वतः सांगितले आहे नाव समोर आले तर राजीनामा देईल त्यामुळे चौकशी पूर्ण होऊ द्या असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पोलिस चौकशीत नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
दरम्यान, अजित दादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण बाबत एकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये दोन गट असल्याचं बघायला मिळत आहे. त्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांच्यावर झालेल्या या कारवाईचे धागेदोरे विलीनीकरणाशी संबंधित नाहीत ना? अशी चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरू आहे. मात्र आता आगामी काळात याबाबतचे सत्य समोर येणार आहे.