भोंदूबाबा खरात प्रकरणातील तीन अधिकारी कोण? विधानसभेत विरोधकांचा खळबळजनक दावा

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र विधानसभा दणाणली आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी सत्ताधारी मंत्री व बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या संबंधांवरून सरकारला धारेवर धरले असून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भोंदूबाबा खरात प्रकरणातील तीन अधिकारी कोण? विधानसभेत विरोधकांचा खळबळजनक दावा
Ashok Kharat new photo
| Updated on: Mar 23, 2026 | 1:11 PM

अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या नाशिकच्या तथाकथित भोंदूबाबा खरात याच्या कृत्यांनी महाराष्ट्र विधिमंडळाचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी केवळ भोंदूगिरीच नाही, तर राजकारणी आणि बड्या सनदी अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले आहेत. याच मुद्द्यावरुन आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तसेच याप्रकरणी विरोधकांनी विधानसभेत सरकारला पूर्णपणे घेरले. पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सर्वांचे सीडीआर तपासा

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणी सभागृहात भाष्य केले. यावेळी त्यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी धक्कादायक माहिती सभागृहासमोर ठेवली. ते म्हणाले, अशोक खरात हा भोंदूबाबा ओशोन जल नावाचा एक प्रकार तयार करायचा. हे जल प्राप्त करण्यासाठी अनेक बडे लोक, ज्यामध्ये मंत्री आणि आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, त्याच्या आश्रमात चकरा मारत असत. खरातवर कारवाई होऊ नये म्हणून तीन विशिष्ट अधिकारी त्याला सातत्याने कवच पुरवत होते. ज्यांचे ज्यांचे खरातसोबत फोटो आले आहेत, त्या सर्वांचे सीडीआर तपासा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा प्रवृत्तीला समर्थन देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.

नाना पटोलेंची मागणी काय?

तर दुसरीकडे यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांचे राज्य आहे. अशा राज्यात एका भोंदूबाबाचा वरचश्मा चालतो आणि त्याला सत्ताधारी मंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात, हे लांछनास्पद आहे. ज्या मंत्र्यांचे या भोंदूबासासोबत संबंध आहेत, त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. या विषयावर विधानसभेत विशेष चर्चा घडवून आणून दूध का दूध पाणी का पाणी झालेच पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.

भास्कर जाधव काय म्हणाले?

त्यासोबतच आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राचे अधिवेशन सध्या सुरु आहे. याप्रकरणी सरकारचा संबंध आला आहे. सरकार याप्रकरणी त्या भोंदूला अटक करुन पुढची चौकशी करतंय. यात आयएएस, आयपीएस असे पोलीस अधिकारी यात आहेत. त्यात सर्व पक्षाचे प्रतिनिधी आहेत. मंत्री आहेत. पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेत आला होता. पण त्यावेळी सरकारने यात कोणतेही तथ्य नाही, असे सांगितले होते, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगायचं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशंज म्हणून सांगायचं. आम्ही जरा काय झालं की गोमूत्र पाजायचं आणि आता तुम्ही त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. तुम्हाला लाज वाटत नाही का, या महाराष्ट्रात असे उद्योग करायला जाता. ज्या छत्रपतींचे नाव घेता, त्यांनी अमावस्या कधी आहे हे पाहिले नाही, त्यांनी पौर्णिमा कधी पाहिली नाही, पितृपक्ष कधी पाहिला नाही, ज्योतिष कधी पाहिला नाही. गंडे, दोरे, अंगठ्या, खडे … हे उद्योग कशाला करायला हवेत. तुमचा लोकांनी आदर्श कशाला ठेवायचा. तुमचे अनुकरण करायचं. त्यामुळे याविषयी सरकारने गांभीर्याने भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

Follow Us