Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

| Updated on: Jan 18, 2022 | 12:03 PM

नाशिक महापालिकेने कोरोना बळींची खरी आकडेवारी लपवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोरोना बळीच्या आकडेवारीमध्ये महापालिकेने स्वतःच्या रेकॉर्डमध्ये तब्बल पावणेतीन हजारांची भर घातली आहे. म्हणजेच प्रत्यक्षात मृत्यूची संख्या जास्त असल्याचे समोर येत आहे.

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?
Nashik Municipal Corporation.
Follow us on

नाशिकः नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले होते. त्यात दुसरी लाट तर इतकी भीषण होती की, नागरिकांना ऑक्सिजनसाठी रांगा लावाव्या लागल्या. अनेकजण रुग्णालयातील मृत्यूशय्येवर असणाऱ्या आपल्या जीवलगासाठी रस्त्यावर उतरले. त्यांचे रडणारे, दयेची मागणी करणारे, ऑक्सिजन द्या म्हणणारे चेहरे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्या लाटेची गंभीरता आता पुन्हा जाणवण्याचे कारणही तितकेच गंभीर आहे. त्याचे झाले असे की, नाशिक महापालिकेने कोरोना बळींची खरी आकडेवारी लपवली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोरोना बळीच्या आकडेवारीमध्ये महापालिकेने स्वतःच्या रेकॉर्डमध्ये तब्बल पावणेतीन हजारांची भर घातली आहे. म्हणजेच प्रत्यक्षात मृत्यूची संख्या जास्त असल्याचे समोर येत आहे. महापालिकेने कसलेही मृत्यू लपवले नाहीत. जी आकडेवारी आहे ती खरी आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

कसे झाले उघड?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. मात्र, सरकारी रेकॉर्डनुसार कोरोना बळींची संख्या 4 हजार 33 आहे. मात्र, आता त्यात तब्बल 2800 बळींची भर पडली आहे. कारण सानुग्रह अनुदानासाठी मंजूर केलेल्या अर्जाची संख्या तब्बल 6800 वर गेली आहे. कोरोनाच्या सानुग्रह अनुदानासाटी एकूण 8 हजार अर्ज आले होते. त्यापैकी 1400 अर्ज फेटाळण्यात आले. तर 6800 अर्ज मदतीसाठी पात्र ठरले. त्यामुळे बळींची संख्या रेकॉर्डवर 2800 नी वाढली आहे.

पालिका म्हणते लपवाछपवी नाही…

कोरोना बळींचा आकडा 2800 नी वाढल्यामुळे प्रशासनही हादरले आहे. ही खरोखरीची आकडेवारी आहे की, अनेकांनी सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी खटाटोप केली, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय हे अनुदान मिळवून देण्यासाठी अनेक एजंट ही सक्रिय झाले होते. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कसून तपासणी सुरू केल्याचे समजते. याबाबत महापालिकेची वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोरोनाच्या आकडेवारीमध्ये काहीही घोळ झालेला नाही. कुठलिही आकडेवारी आम्ही लपवलेली नाही. अर्जाची संख्या वाढली आहे. मात्र, त्यांनी कागदपत्रे जोडली आहेत. अनेकांचा कोरोना रिपोर्ट मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला. कोणी मृत्यूनंतर कागदपत्रे घेऊन अर्ज केले. जे लाभार्थी आहेत, असे अर्ज मंजूर केले आहेत. इतक्या दिवस आम्ही चांगले काम केले. एकही मृत्यू लपवला नाही. मृत्यूची आकडेवारी लपवून आमचे काहीही साध्य होणार नाही. जे खरे आहे ते खरे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

कोरोनाची कसलिही आकडेवारी महापालिकेने लपवली नाही. सानुग्रह अनुदानाचे अर्ज वाढले आहेत. संबंधित व्यक्तींनी कागदपत्रे, पुरावे जोडली. अनेक जणांचे जिल्हाबाहेर मृत्यू आहेत. जे आहे ते समोर आहे. लपवून काय साध्य होणार आहे.
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

इतर बातम्याः

Nashik | भुजबळांच्या घरासमोर भल्या पहाटे निषेधाची काळी रांगोळी, पोलीस बंदोबस्तात वाढ, प्रकरण काय?

Nashik Water | नाशिकमध्ये गुरुवारी निर्जळी; शुक्रवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा!

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!