गळ्यात कांद्याच्या माळा, जोरदार घोषणाबाजी.. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला, हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
नाशिकच्या चांदवड येथे कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरत आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली. यात मविआचे नेते हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार सहभागी होते, ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून पुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कांद्याला योग्य हमीभाव मिळावा अशी उत्पादकांची मागणी असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या चांदवड येथे शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. मविआच्या अनेक नेत्यासंह शेकडो उत्पादक, एसतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी महामार्ग रोखून धरत तेथील गाड्यांची हवा काढण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता या आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले.
त्यानंतर महामार्गावर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी या आंदोलकांची सरळ धरपकड सुरू केली. या क्रांती महामोर्चात शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यासह खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, शोभाताई बच्छाव हेही उपस्थित होते.
गळ्याता कांद्याचा माळा, घोषणाबाजी
गळ्यात कांद्यांच्या माळा घालून, जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू होतं. कांद्याला समाधानकारक हमीभाव मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरण्याचा, अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, अंबादास दानवे यांना जबरदस्तीने पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. मात्र आम्हाला पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं तरी देखील आम्ही आगेकूच करणारच , असा निर्धार या मोर्चेकरांनी व्यक्त केला.
हे आंदोलन इथेच संपणार नाही
आमचं एवढंच म्हणणं होतं, या शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष जात नाही. पण यात शासनाचं लक्षं आलं पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करायला गेलो, तर मी असेन, शशिकांत शिंदे असतो, हर्षवर्धन सपकाळ असोत, अंबादास दानवे आहेत, आम्हाला जर अशा पद्धतीने ताब्यात घेतलं असेल तर हा लोकशाहीचा घात आहे. पण हे आंदोलन इथेच संपलं असं नाही, हे वाढवावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले. सामान्य लोक सिस्टीम विरोधात जर उतरले नाहीत, तर हे सरकार त्याच सामान्य लोकांचे हाल करेल अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
ये सरकार हमसे डरती है..
ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है.. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही. सरकारने दिलेलं आश्वासन जे आहे, ते पाळायलाही ते तयार नाहीत. आणि जाब विचारणाऱ्यांना, सत्याग्रहींना पोलिस ताब्यात घेऊन कारवाई करत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाल यांनी केली.
काय आहेत मागण्या ?
चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आल. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होते. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करा, विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.