Chhagan Bhujbal : ‘याचा अर्थ मला पालकमंत्री करा असा होत नाही’, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण
Chhagan Bhujbal : नाशिकमधील खड्ड्यांमुळे काही निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी 'गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही' असं विधान केलं होतं

नाशिकमधील खड्ड्यांमुळे काही निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी ‘गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही’ असं विधान केलं होतं. भुजबळांच्या विधानावरुन महायुतीत विसंवाद असल्याचं दिसून आलं होतं. आता छगन भुजबळ यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. “खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषत: रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. खड्डयांमुळे चार-पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. म्हणून नाशिकबद्दल बरच काही बोललं जात आहे. याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही. आहे त्यांच्याकडून काम व्यवस्थित करा असं माझं म्हणणं आहे” असं छगन भुजबळ बोलले. “छगन भुजबळांना पालकमंत्री करा असे ज्यांनी फ्लेक्स लावले, त्यांच्यापर्यंत मी माझी नापसंती पोहोचवली. माझ्या नावाचे फ्लेक्स काढायला लावले” असं छगन भुजबळ म्हणाले.
“नाशिक जिल्ह्यात, शहरात समस्या आहेत, म्हणून आपण सारखं दाखवत असता. मी सुद्धा त्या संदर्भात बोललो. आता कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख आहेत. त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले. “पावसाळ्यात खड्डे भरले पाहिजेत, जेणेकरुन अपघात होणार नाहीत. खोदून ठेवलय, खड्डे आहेत मग अडचण निर्माण होते. ट्रॅफिक जॅम होतं, याकडे लक्ष दिलं पाहिजे” असं छगन भुजबळ बोलले.
त्या बद्दल मला काही बोलायचं नाही
नाशिक जिल्ह्यातून पाच-सहामंत्री आहेत, तरी नाशिककडे दुर्लक्ष होतय असं म्हणायचं आहे का आपल्याला?. “त्या बद्दल मला काही बोलायचं नाही. सर्व संबंधित अधिकारी, कारभारी यांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असं मला वाटतं. कुंभमेळ्यावर माझी नाराजी नाही. खड्ड्यांमुळे चार-पाच मृत्यू झालेत. नगरसेवक, महापौर सगळे त्रस्त आहेत. त्यामुळे मी या संदर्भात बोललो. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतदारसंघातील अडचणी सोडवल्या पाहिजेत” असं भुजबळ म्हणाले.
ओबीसी जनगणना दुसऱ्या टप्यात होणार
“ओबीसी जनगणना व्हावी ही आमची जुनी मागणी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यात हे होणार आहे. या गोष्टीला उजाळा देणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. ते करत आहेत, माझा विरोध नाही” असं छगन भुजबळ बोलले.
