भुजबळांचा गिरीश महाजनांवर संताप, महाजन थेट नाशिकमध्ये; चार ओळीत दिलं उत्तर
Nashik Accidents : नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला होता, यावर आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

नाशिकमधील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत, यात आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी संपात व्यक्त केला होता. जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही असं विधान केले होते. यावर आता गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे.
महाजनांचे भुजबळांना उत्तर…
गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, ‘जबाबदारी माझी आहे, ‘मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाहीत त्यामुळे व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहे. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहे, कॅमेरा लावत आहोत. नवीन आणि मॉडर्न नाशिक आपण करत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही.’
पैशांची चिंता करू नका…
पुढे बोलताना महाजन यांनी म्हटले की, ‘काल दुर्दैवी अपघात झाला. नागरिकांचा रोष आपल्यावर असणे स्वाभाविक आहे. नाशकात रस्त्यांची कामे सुरू आहेत, खोदकाम सुद्धा सुरू आहे. 4 ते 6 महिन्यात कामे पूर्ण करायची आहेत. पर्यायी रस्ते व्यवस्थित पाहिजेत असं मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, खड्डे पडणार नाहीच याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. ठेकेदार रस्ता चांगला ठेवतो की नाही लक्ष ठेवा. खड्डे दिसणार नाही अशी व्यवस्था करायची आहे. दोन ते तीन दिवसांत खड्डे बुजवा. अंबड रस्ता सरसकट चांगला करा. परवानग्या मी देतो पैशाची चिंता करू नका. तात्काळ काम करा, बैठक झाली हीच परवानगी समजा.’
अधिकाऱ्यांना कामावर लक्ष ठेवावे…
पुढे बोलताना महाजन यांनी म्हटले की, ‘कॉलनीतील रस्ते सुद्धा खराब आहे, वेगळा फंड निर्माण करू रस्ते चांगले झाले पाहिजे. थोडे दिवस त्रास होईल, फार दिवस त्रास होणार नाही. खड्डे बुजवतांना माती मुरूम टाकू नका. काम सुरू आणि अधिकारी नाही हे खपवून घेणार नाही. लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकं मृत्युमुखी पडत आहे कुणालाही पाठीशी घालणार नाही. नवा जुना बघणार नाही, कारवाई होईल. अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ट्रॅफिक पोलिसांनी अलर्ट राहावे. खड्ड्यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्या.’
