मोठी बातमी ! राज्यात दंगली घडवण्याचा कट, पडद्यामागे पटकथा लिहिली जातेय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

| Updated on: Mar 24, 2023 | 12:55 PM

विरोधकांवर दहशत निर्माण व्हावी यासाठी हा सुरतचा निकाल आहे. संपूर्ण विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आहे, असं सांगतानाच बदनामी झाली तर मोदींनी स्वत: खटला दाखल का नाही केला? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

मोठी बातमी ! राज्यात दंगली घडवण्याचा कट, पडद्यामागे पटकथा लिहिली जातेय; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक : मनसेच्या इशाऱ्यानंतर राज्यात मजारींना टार्गेट केलं जात आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांना महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं आहे. दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरे जायचं अशी पडद्यामागची पटकथा लिहिली जात आहे. शिवसेना आणि मविआला जो पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हादरलेले आहेत. आमच्याशी सामना करता येत नाही म्हणून त्यांना जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या आहेत. पुन्हा एकदा राज्यात आणि देशात भितीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचं असं कारस्थान दिसत आहे. ही पडद्यामागची पटकथा दिसली आहे. त्यामुळे या पटकथेला जनमानसात स्थान मिळणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही विधान भवनात एकत्र दिसले. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोघांसाठी वेगळा रस्ता निघाला तर आपण बघू. पण विधीमंडळात जाण्याचा रस्ता एकच आहे. त्यांच्याबाबतच्या सर्व अफवा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनाही फटकारले. शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. जसं त्यांच्या नेत्याचं होतं तसं आहे का? आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने विचार काम करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसऱ्याचे डोके आम्हाला लागत नाही, असा टोला त्यांनी संदीप देशपांडे यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

हाच त्यांचा अमृतकाळ

14 राजकीय पक्षांनी ईडी आणि सीबीआयच्या होणाऱ्या वापराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यावर राऊत यांनी त्यात चुकीचं काय? असा सवाल केला आहे. सर्वच यंत्रणा आज सत्ताधाऱ्यांच्या गुलाम बनल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भ्रष्टाचार एकाच पक्षाचा नसतो. सत्तेवर जे असतात त्यांचाही भ्रष्टाचार असतो.

आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यांच्याच चूक शोधून काढत आहेत. नसलेल्या चुकाना मोठे स्वरुप देत आहेत. कार्यवाही करतात, दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय. हे लपून राहिलेलं नाही. नरेंद्र मोदी म्हणतात, अमृतकाळ सुरू आहे, हाच त्यांचा अमृतकाळ आहे. सूड आणि बदल्यांचं राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

मोदींनी याचिका का दाखल केली नाही

राहुल गांधी यांना ज्या खटल्यात शिक्षा झाली 2 वर्षाची ती नरेंद्र मोदी यांची बदनामी असेल असं वाटत असेल तर नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी येते, खटला दाखल करते, सुरत न्यायालय यावर निर्णय देते हा काय प्रकार आहे? कशासाठी चालले हे सगळं? राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.