दळण आणत असतानाच बिबट्याने घात केला; चिमुकलीला फरफटत…

पिंपळद येथील चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने आता वन विभागाने लक्ष घालून यावर उपाय काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

दळण आणत असतानाच बिबट्याने घात केला; चिमुकलीला फरफटत...
| Edited By: | Updated on: Apr 06, 2023 | 10:06 PM

त्र्यंबकेश्वर / नाशिक : गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला असून मनुष्यप्राण्यांवरही हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी दुगारवाडी, धुमोडी, वेळुंजे, ब्राह्मणवाडे या भागात बिबट्याकडून लोकांवर हल्ले करण्यात आले होते. त्या पाठोपाठ आज पिंपलद येथील एका लहान मुलीवर बिबट्या हल्ला करून चिमुरडीला जंगलात ओढून घेऊन गेला होता. मात्र त्या लहान मुलीच्या बहिणीने आणि आईने आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने मुलीला सोडून पळून गेला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्यात आठ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. प्रगती भाऊसाहेब सकाळे असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव असून ती आई आणी बहिणीसोबत शेतातून दळण घेऊन घराकडे जात होती.

त्यावेळी अशेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून फरफटत घेऊन गेला. हल्ला होताच बहिणीने आरडा ओरडा केल्याने गावातील संजु भाऊ टिळे, रामभाऊ सकाळे यांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून धूम ठोकली.

या हल्ल्यात ती बालिका गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी तात्काळ त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्याचबरोबर मानवी वस्तीकडे त्यांचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळद येथील चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने आता वन विभागाने लक्ष घालून यावर उपाय काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

त्यानंतर पाच पिंजरे मागवत बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. या दरम्यान ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.