बागेश्वर बाबांच्या चमत्कारांचा वाद, महाराष्ट्रातील साधूसंतांची उडी, 51 लाखांचा दावा…

हिंदू धर्माला अंनिसकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप नाशिकच्या साधू महंतांनी केला आहे.

बागेश्वर बाबांच्या चमत्कारांचा वाद, महाराष्ट्रातील साधूसंतांची उडी, 51 लाखांचा दावा...
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 23, 2023 | 10:39 AM

चंदन पूजाधिकारी, नाशिकः बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) अर्थात धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या चमत्कारांच्या दाव्याने देशभरात खळबळ माजवली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील साधू महंतांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. महाराष्ट्रातील साधू संतांनी बागेश्वर बाबांचं प्रकरण उचलून धरलं आहे. मी चमत्कार करतो, असा दावा बागेश्वर बाबांनी केलाच नाहीये. मात्र त्यांच्याकडे गेल्याने माझं कल्याण झालं, असं लोक म्हणत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) त्यांच्याविरोधात दावा ठोकणं चुकीचं आहे, अशी भूमिका नाशिकच्या साधू संतांनी घेतली आहे.

हिंदू धर्माला अंनिसकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप नाशिकच्या साधू महंतांनी केला आहे. तर महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलन कायदाच रद्द करण्यासाठी साधू महंत आज एकवटणार आहेत. नाशिक येथील रामकुंडावर आज यासाठी आंदोलन केलं जाणार आहे.
या आंदोलनात 10 आखाड्याचे साधू-महंत होणार सहभागी होणार आहेत.

महंत अनिकेतशास्त्री काय म्हणाले?

महंत अनिकेत शास्त्री यांनी बागेश्वर बाबांविषयीची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘ बागेश्वर बाबा यांनी कधीही आणि कुठेही असं दावा केला नाहीये की माझ्याकडे अद्भुत शक्ती आहे.. महाराजांकडे गेल्यामुळे माझं कल्याण झालं आणि या कारणावरून अनिस अंधश्रद्धा निर्मूलन जर केस करत असेल दावा ठोकत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे.

बागेश्वर धामचं कार्य खूप चांगलं आहे. परंतु ते जर का असा दावा करत असतील की माझ्याकडे अद्भुत शक्ती आहे तर ते सुद्धा निंदनीय आहे आणि त्याचं समर्थन कधीही सनातन धर्माने केलेलं नाही…

हा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी अतिशय कठोर प्रयत्न केले.. ते स्वर्गीय दाभोळकर साहेब तर नरेंद्र दाभोळकर साहेबांचा उद्देश आणि आज त्यांच्या अनुयायींचा उद्देश याच्यामध्ये फार मोठी तफावत दिसत आहे.

साधुसंतांनी कायम समाज सुधारणाच केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या द्वारे फक्त आणि फक्त हिंदूंना टार्गेट केलं जातं.. इतर धर्मियांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कधीही बघत नाही. फक्त हिंदू धर्माला टार्गेट करणे हा त्यांचा उद्देश आहे.. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रातल्या लवकरात लवकर रद्द व्हावा, अशी मागणी अनिकेत शास्त्री यांनी केली आहे.

51 लाख रुपयांचं पारितोषिक

मौलाना, पादरी, भंते यांच्याकडून चमत्कार सिद्ध करावयाचे दावे केले जातात. ते त्यांनी सिद्ध करून दाखवले तर आम्ही 51 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करतो, असं चॅलेंजही अनिकेत शास्त्री यांनी दिलंय.

अंनिसची भूमिका काय?

लोकांच्या मनातील गोष्टी आपण दिव्य दृष्टीने ओळखतो, अनोळखी व्यक्तीचे नावही सांगू शकतो, असा दावा बागेश्वर बाबा यांनी केला आहे. त्यांनी हा चमत्कार सिद्ध करून दाखवावा, असं आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. यावरून देशभरातील साधू महंतांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us